वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 41 वर्षांनी पदकाचा दुष्काळ संपवत भारतीय हॉकी टीमने टोकियोत ऑलिम्पिक मेडल जिंकले आहे. परंतु भारत विरुद्ध जर्मनी या सामन्याचे महत्व सर्वसामान्य सामन्यापेक्षा अतिशय वेगळे ठरले. जागतिक हॉकीच्या इतिहासात एवढा गुणवत्तावान सामना मी बऱ्याच वर्षांत पाहिलेला नाही. जागतिक कीर्तीचे अनेक हॉकी कोच आपल्या विद्यार्थ्यांना हा सामना वारंवार दाखवत राहतील, अशी प्रतिक्रिया मौलिक प्रतिक्रिया भारताचे सुवर्णपुत्र मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र आणि भारतीय ऑलिम्पिक अशोक ध्यानचंद यांनी व्यक्त केली आहे. India-Germany match will be recorded as one of the best matches in world hockey: Ashok Dhyanchand
भारत आणि जर्मनी यांच्यातला टोकियो ऑलिंपिकमध्ये मध्ये झालेला ब्राँझ पदकासाठीच्या सामन्याचे अचूक वर्णन आणि विश्लेषण अशोक ध्यानचंद यांनी केले आहे. युरोपीय आणि भारतीय हॉकीची वैशिष्ट्ये ठासून भरलेल्या या सामन्यात नेमके काय झाले? भारतीय टीमने जर्मनीवर कशी मात केल? याचे वर्णन अशोक यांनी केले आहे.
ते म्हणाले, अत्यंत वेगवान खेळ हे युरोपियन हॉकीचे वैशिष्ट्य आहे. वेगवान खेळून समोरच्या टीमला सतत गोंधळात ठेवणे आणि त्यांच्याकडून चूका झाल्या की त्याचा फायदा घेणे हे युरोपियन टीमचे वैशिष्ट्य आहे. जर्मनीच्या टीमने आज त्याच पद्धतीने अत्यंत आक्रमक सुरुवात करून भारतीय टीमला गोंधळात टाकले. बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडले. परंतु जर्मनीच्या टीमची ही क्लुप्ती पहिल्या हाफमध्ये फक्त १५ मिनिटेच टिकली. भारतीय टीमने १५ मिनिटानंतर जी जबरदस्त उसळी घेतली तिला तोड नाही. त्यानंतर भारतीय टीमने जर्मनीच्या टीम विरूद्ध नुसताच तोडीसतोड खेळ केला नाही, तर त्यावर यशस्वी मात करून दाखविली.
यातला प्रत्येक मोमेंट जागतिक पातळीवरच्या हॉकीच्या इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे. जागतिक कीर्तीचे कोच या सामन्याकडे एक धडा म्हणून पाहतील. वेगवान, आक्रमक आणि बचावात्मक या तीनही प्रकारांचे उत्कृष्ट दर्शन आजच्या सामन्यात झाले. खेळाडू आपल्या उणिवांवर कशा मात करतात?, पटकन निर्णय कसा फिरवू शकतात?, याची आजच्या सामन्यात अनेक उदाहरणे सापडतील. भारतीय टीमने आपल्या पूर्वीच्या जोश आणि विजयाची चुणूक यानिमित्ताने दाखवून दिली आहे. भारतीय हॉकी टीमचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू होऊ शकतो हे आजच्या सामन्यातून दिसले, असा आत्मविश्वास अशोक ध्यानचंद यांनी व्यक्त केला आहे.