समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. शनिवारी (18 डिसेंबर) सकाळपासून हे छापे सुरू झाले. Income tax raids on Akhilesh Yadav relatives house till late at night, documents of anonymous assets found
वृत्तसंस्था
लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. शनिवारी (18 डिसेंबर) सकाळपासून हे छापे सुरू झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने व्यापारी राहुल भसीन यांच्या दिल्लीतील घरावरही छापा टाकला. छाप्यादरम्यान प्राप्तिकर विभागाला अनेक बेनामी मालमत्ता तसेच कंपन्यांची कागदपत्रे सापडली आहेत. याबाबत आयकर विभागाचे अधिकारी राहुल भसीनची चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे ओएसडी जैनेंद्र यादव ऊर्फ नीतू, राहुल भसीन, मनोज यादव आणि जगत यादव यांच्या घरावर सुरू झालेले छापे 36 तासांनंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रविवारी आयकर विभागाच्या पथकाने राहुल भसीनच्या दिल्लीतील निवासस्थानाचीही झडती घेतली. आतापर्यंतच्या तपासात विभागाला जैनेंद्र यादव यांच्या घरातून मिनरल वॉटर कंपनीची कागदपत्रेही सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
या नव्या कंपनीच्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीची विभाग चौकशी करत असल्याचे बोलले जात आहे. 2012 मध्ये सपा सरकार आल्यापासून जैनेंद्र यादव यांचा दर्जा वाढतच गेला. प्राप्तिकर विभागाचे पथक यादव आणि त्यांचे कुटुंबीय तसेच जवळच्या नातेवाइकांच्या नावे खरेदी केलेल्या मालमत्तेची चौकशी करत आहेत.
सपाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय यांच्या मऊ आणि बंगळुरू येथील ठिकाणांवरील प्राप्तिकर विभागाचे छापे संपले आहेत. मऊ येथील राजीव राय यांच्या घरातून विभागाला सुमारे 76 हजार रुपये रोख मिळाले आहेत. यामध्ये राजीव राय यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरांकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा समावेश आहे. मात्र, छापा टाकल्यानंतर राजीव राय यांनी दावा केला की, 15 तासांच्या तपासात प्राप्तिकर पथकाला त्यांच्या घरातून केवळ 17,000 रुपये मिळाले.
यूपी निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईवर सपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. अजय मिश्रांसारख्या लोकांवर कारवाई होत नाही, तर सपा नेत्यांना केंद्रीय एजन्सींच्या माध्यमातून धमकावले जात असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. अखिलेश म्हणाले की, जेव्हा भाजपला पराभवाची भीती वाटते तेव्हा असे घडते.