वृत्तसंस्था
जगदलपूर – सीआरपीएफसह सुरक्षा दलांबरोबर झालेल्या संघर्षात नक्षलवाद्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून त्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात खोलवर नेले आहे. आपल्या जवानांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. त्यातूनच नक्षलवाद्यांविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडमध्ये येऊन दिली. I want to assure the countrymen that this battle (against Naxals) will be intensified & we will win it , says home minister amit shah
अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या समवेत सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन नक्षलवादी विरोधी मोहिमेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना परिस्थितीची माहिती दिली. नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की सुरक्षा एजन्सीजनी जंगलात खोलवर कॅम्प तयार केलेत. ते नक्षलवाद्यांना रूचलेले नाही. नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. त्यामुळे नक्षलवाद्यांनी चिडून सुरक्षा दलांवर हल्ले केले. पण गुप्तचर विभागाने योग्य माहिती दिल्यावर नक्षलवाद्यांविरोधात मोहीम तीव्र केली. त्यातून हा मोठा संघर्ष झाला. २२ जवान शहीद झाले. पण नक्षलवाद्यांनाही प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. त्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉलीज भरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि जखमी नक्षलवादी खोलवर जंगलात नेले आहेत.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांमुळे सुरक्षा दलांची पिछेहाट होणार नाही. आपल्या जवानांचे मनोधैर्य उंचावलेलेच राहील. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहीम तीव्र केली जाईल. सुरक्षा दलांना सर्व प्रकारची शस्त्रे तसेच अन्य लॉजिस्टिक्सची मदत दिली जाईल, अशी ग्वाही देखील अमित शहा यांनी दिली.
आदिवासी भागात विकासकामांना गती दिली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारची देखील मदत मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली.