महाराष्ट्रात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा; विदर्भाला यलो, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई पुण्याला पावसाने झोपडपले आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यातच आता राज्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यात सिंधुदुर्गाला रेड अलर्ट तर विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Heavy rain warning in next 48 hours in Maharashtra
48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होणार
मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. आता राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा
येत्या काही तासांतच मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबईत पावसाची संततधार
मुंबईत पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, कुलाबा, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पुढील 3-4 तास मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर तशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान खात्याने आवाहन केलेय.
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. आमदार रवींद्र धंगेकर यांनी याबाबत ट्विट करत मानपावर टीका केली आहे.