वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात आजपासून कोरोनाविरोधी लस देण्याच्या उत्सवाला सुरुवात होत आहे .11 ते 14 एप्रिल दरम्यान हा उत्सव सुरु राहणार आहे. Four days of ‘vaccination festival’ across the country from today
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. तेव्हा 11 ते 14 एप्रिल दरम्यान देशात लस उत्सव राबविण्याची घोषणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंत रविवारपासून (ता.11) ते बुधवार (ता. 14 ) देशभरात ‘लस उत्सव’ आयोजित केला आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा मुख्य हेतू आहे. ‘लस उत्सव’ या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले आहे. त्यासाठी नेतेमंडळींनीही पुढाकार घेतला आहे.
85 दिवसांत दिल्या गेल्या 10 कोटी लसी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार भारतात 85 दिवसांमध्ये 10 कोटी लसी दिल्या आहेत. यामुळं जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा पहिलाच देश ठरत आहे. चीनला 10 कोटी लसी देण्यासाठी 102 दिवासांचा कालावधी लागला होता.
लस वाया जाऊ देऊ नका, पंतप्रधानांचं आवाहन
लस कोणत्याही प्रकारे वाया जाऊ दिली जाणार नाही, यावर आपण लक्ष दिलं पाहिजे यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही दिसले, ‘अनेकदा यामुळं परिस्थिती आणि प्रसंग बदलण्यास मदत होते. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. आपण लस उत्सवाचं आयोजन करु शकतोय का? तशी वातावरणनिर्मिती करु शकतोय का? एका खास मोहिमेअंतर्गत आपण अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही लस पोहोचवली पाहिजे. लस कशा पद्धतीनं वाया जाणार नाही, यावर लक्ष दिलं पाहिजे. ‘लस उत्सव’ दरम्यानच्या चार दिवसांत लस वाया गेली नाही, तर आपली लसीकरण क्षमताही वाढलेली असेल.’
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा
दरम्यान, एकीकडे लस उत्सवाची हाक पंतप्रधानांनी दिलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र लसींचा तुटवडा आहे. त्यातच लसींच्या पुरवठ्यावरुन राजकारणही तापू लागलं आहे.