शहरात आता पूर्वीसारखी आठ तासांची डय़ुटी नसते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी राहतो. या सगळ्यात जीव मेटाकुटीला येतो आणि पंचेचाळीसाव्या वर्षीच या सर्व कटकटीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन जीवनाचा आनंद उपभोगूया असे विचार घोळू लागतात. आयुष्य स्वतच्या मर्जीनुसार जगणे याची व्याख्या स्पष्ट असणे गरजेचे असते. स्वेच्छानिवृत्ती घेताना पुढील आयुष्यात पुरेल इतका पैसा हाताशी आहे का याचा विचार आवश्यक असतो. हा विचार करताना आपले अपेक्षित आयुर्मान हे ८०-८५ इतकेच धरलेले असते. पुढील काळात वाढणाऱ्या महागाईवर आपले नियंत्रण नसते. परिणामी उत्तर आयुष्यात पैसे कमी पडण्याची शक्यता असते. स्वेच्छानिवृत्तीनंतर आपल्या वेळेचा उपयोग कसा करणार याचे गणित मांडावे लागते. आर्थिक बाबींचा विचार करायचा झाला तर तुम्ही उच्च उत्त्पन्न गटात असणे गरजेचे आहे. Money Matters: Think about retirement income first and then make other decisions
मासिक बचतीमध्ये निवृत्ती नियोजनासाठी मोठय़ा रकमेची एसआयपी आवश्यक आहे. ज्यायोगे पुढील काळात लागणारी अपेक्षित पुंजी नोकरी-व्यवसायात असताना १०-१५ वर्षांत तयार होईल. तुम्हाला ४०-४५ व्या वयाच्या सुमारास नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचे नियोजन ७-८ वर्षे आधी सुरू करावे लागते. सुरुवातीच्या काळात व्यावसायिक उत्पन्न कमी असते किंवा आपलेच पैसे व्यवसायात ओतावे लागतात. अशा वेळेस आपली पुढील एक-दोन वर्षांची घरखर्चाची तरतूद तरल गुंतवणुकीद्वारे करून ठेवावी लागते. व्यवसाय काय करणार याचे चित्र स्पष्ट असावे लागते. समजा, तुमचे आजचे वय ३० वर्षे आहे. तुमचा मासिक खर्च ५० हजार रुपये आहे. तुम्ही ४० व्या वर्षी निवृत्त होऊ इच्छिता. तुमचे अपेक्षित आयुर्मान १०० वर्षे आहे. महागाईचा दर पाच टक्के आणि गुंतवणुकीवर परतावा आठ टक्के धरल्यास तुमचा १० वर्षांनंतर मासिक खर्च ८१,५०० रुपये होईल. हा खर्च तुमच्या वयाच्या शंभराव्या वर्षांपर्यंत वाढत जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला निवृत्तीनिधी रुपये २.८७ कोटी रुपयांचा लागेल. हा निधी चालू १० वर्षांत जमा करण्यासाठी ८ टक्के परतावा दर जमेस धरल्यास, दरमहा १,५८,००० रुपये एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील.