- जाणून घ्या नेमकं असं का म्हणाले आहेत आणि कशाबद्दल बोलले आहेत?
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. दोन्ही बाजूंकडून सरकारवर दबाव वाढवला जात आहे. अशावेळी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली.Deputy Chief Minister Devendra Phadnis clarified the role of the government regarding Maratha OBC reservation
फडणवीस म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार बांधील आहे आणि तीच आमची भूमिका आहे. त्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही करतो आहोत, ती सुरू केलेली आहे. त्याला जो काही कायदेशीर वेळ द्यावा लागेल, तो कायदेशीर वेळ आम्ही देवू.”
तसेच ”त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजालाही सांगितलेलं आहे, की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त शेवटी राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न काय असणार आहे, तर प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहीजे आणि कुठेही दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत, अशाप्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही. हा प्रयत्न आम्हाला करावा लागेल.” असंही फडणवीस यांनी सांगितलं.
याशिवाय ”मला असं वाटतं की ही केवळ आमचीच जबाबदारी आहे, असं नाही. महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे. प्रत्येक नेत्याची मग ते समाजाचे नेते असो किंवा राजकीय नेते असतील. ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही. अशाप्रकारे विधान केले जातील किंवा आपलं वर्तन कसं राहू शकेल हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहीजे.” असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षण प्रश्नी बोलताना सांगितले.