विनायक ढेरे
काँग्रेसने आज राजधानी नवी दिल्लीत आणि देशभरातल्या विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर मोठे आंदोलन केले आहे. राजधानी दिल्लीतले आंदोलन तर फक्त काळ्याफिती बांधून नव्हे, तर अख्ख्या काळ्या ड्रेपरीत केले आहे. Congress movement not only in black ribbon, but in all black drapery
सगळे नेते काळ्या कपड्यात!!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, जयराम रमेश, प्रियांका गांधी वगैरे बडे नेते अख्ख्या काळ्या कपड्यांमध्ये या आंदोलनामध्ये संसदेपासून राष्ट्रपती भवनाच्या विजय पथावर हजर होते. एरवी अशी आंदोलने काळ्या फिती लावून केली जातात. राहुल गांधींनी आजच्या पत्रकार राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आपल्या पांढऱ्या हाफ शर्टवर काळी फित बांधली होती. पण रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये मात्र ते काळ्या शर्टात सहभागी झाले. त्यांच्याबरोबर बाकीचे नेतेही काळ्या कपड्यांमध्येच होते. किंबहुना या सर्वांनी आजच्या महागाई आणि बेरोजगारी विरोधातल्या आंदोलनासाठी काळे कपडे खास डिझाईनर कडून शिवून घेतले होते. आंदोलनाचा हा कपडेपट आणि ही नेपथ्यरचना निश्चितच भारी होती. त्यामुळे सरकार विरोधात किती वातावरण निर्मिती झाली?, हा भाग अलहिदा. पण काँग्रेसच्या काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मात्र रिचार्ज जरूर झाले. राज्य राज्यांमध्ये मरगळलेली काँग्रेस राज्यांच्या राजधान्यांमध्ये काही काही प्रमाणावर रस्त्यावर दिसली.
नॅशनल हेराल्ड केसची पार्श्वभूमी
पण प्रश्न खरा त्या पलिकडचा आहे. त्याचे उत्तर देणे काँग्रेस नेत्यांना भाग आहे. आजच्या या आंदोलनाने नेमके साध्य केले काय?? काँग्रेसचा संघटनात्मक पातळीवर तत्कालिक लाभ वगळता काँग्रेसच्या आंदोलनाच्या चुकलेल्या राजकीय टाइमिंगचे काय??, हा मूलभूत प्रश्न आहे. काँग्रेसने ज्या महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर आज 5 ऑगस्ट 2022 रोजी महाआंदोलन केले, ते मुद्दे नेमके सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नॅशनल हेराल्ड केस मधल्या ईडी चौकशी दरम्यानच कसे महत्त्वाचे ठरले?? जेव्हा नॅशनल हेराल्ड केस त्यातला हवाला रॅकेटमुळे आता निर्णायक स्थितीमध्ये येऊन ठेपली आहे आणि कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक होण्याची शक्यता आहे, तेव्हाच काँग्रेस नेत्यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन कसे छेडले??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इथेच काँग्रेसच्या आंदोलनाच्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह लागले आहे!!
काँग्रेसच्या विश्वासार्हतेचा प्रश्न
बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे कितीही खरे असले तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर ते उपस्थित केल्याने काँग्रेसच्या आंदोलनाविषयी जनसामान्यांच्या मनात विशिष्ट शंका निर्माण झाली, तर तिला गैर मानता येणार नाही. गेल्या 3 वर्षात हे मुद्दे तेवढेच प्रभावी होते, जेवढे आज आहेत. मग तेव्हा काँग्रेसने आज जसे केले तसे आंदोलन का केले नाही?? भले 2019 च्या पराभवाच्या धक्क्यानंतर पहिले 6 – 8 महिने काँग्रेस संघटनात्मक पातळीवर विस्कळीत झाली असेल. पण 2020 मध्ये तर काँग्रेस इतकी विस्कळीत नव्हती. तोपर्यंत काँग्रेस नेत्यांच्या पराभव पचनी पडला होता. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना आज केले तसे आंदोलन उभे करता आले असते पण ते त्यांनी केले नाही. तसे का केले नाही?? या प्रश्नाचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल. कारण खऱ्या अर्थाने प्रश्न काँग्रेस नेत्यांच्या विश्वासार्हतेचा आहे!!
मूळ मुद्द्यांना बगल देण्याची भाजपला संधी
महागाई आणि बेरोजगार यांच्यासारखे खरे मुद्दे केवळ काँग्रेसचे नेते उपस्थित करतात आणि त्यातही सोनिया राहुल गांधी जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते उपस्थित करतात हा कळीचा मुद्दा आहे आणि इथेच हे महत्त्वाचे मुद्दे बॅकफुटला जाऊन काँग्रेसच्या नेत्यांविषयी आणि काँग्रेसच्या आंदोलनाविषयी शरसंधान साधण्यासाठी भाजपच्या नेत्यांना संधी मिळते. भाजपचे नेते काँग्रेसने उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्यांना उत्तरे देण्याच्या फंदातच पडत नाहीत. ते सरळ सरळ नॅशनल हेराल्ड केस मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधून मोकळे होऊ शकतात. भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी आजच्या पत्रकार परिषदेत नेमके हेच केले आहे.
प्रश्नचिन्हांकित काळीमा
… आणि म्हणूनच काँग्रेस नेत्यांनी कितीही उच्च रवाने महागाई आणि बेरोजगारी या देशाला भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांवर आवाज उठवला असला तरी त्याच्या प्रामाणिक ते विषयी शंका घ्यायला जनसामान्यांना वाव शिल्लक राहतो… आणि इथेच फक्त काळ्याफिती बांधून नव्हे, तर अख्ख्या काळ्या कपड्यात केलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्हांकित काळीमा लागला आहे!!
Congress movement not only in black ribbon, but in all black drapery
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बांठिया अहवालातील त्रुटी दूर करण्याची मागणी
- मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा
- जस्टिस उदय यू. लळीत होणार देशाचे ४९ वे सरन्यायाधीश, २७ ऑगस्टला शपथविधी, ८ नोव्हेंबरपर्यंत कार्यकाळ
- जुन्याच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक; महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये फूट पाडायला कारणीभूत!!