प्रादेशिकांच्या जातीय राजकारणाच्या अजेंड्यावर काँग्रेसचा डल्ला; 3 राज्यांमध्ये मार खाल्ला!!, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या आजच्या पराभवाचे वर्णन करावे लागेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्य काँग्रेसने गमावली आणि फक्त तेलंगणामध्ये फक्त विजय प्राप्त केला. Congress followed regional casteist politics and lost 3 states madhya Pradesh, rajasthan and chattisghar
आता त्यावरून अशोक गेहलोत कुठे चुकले??, कमलनाथ कुठे कमी पडले??, भूपेश बघेल कशात अडकले??, वगैरे कारणमीमांसा आणि विश्लेषणे सुरू आहेत. पण माध्यमांनी नेहमीप्रमाणे यातला खरा कळीचा मुद्दा कोणता होता??, काँग्रेस पक्ष म्हणून आणि काँग्रेस हायकमांड म्हणून नेमके कोण, काय आणि कुठे चुकले??, यावर आपल्या सोयीचे बचावात्मक भाष्य केले आहे. सत्य बोलायला माध्यमे घाबरली आहेत.
पण काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीत हे का आणि कसे घडले??, याचा बारकाईने विचार केला, तर शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे प्रादेशिकांच्या जातीय राजकारणाच्या अजेंड्यावर काँग्रेसचा डल्ला आणि 3 राज्यांमध्ये मार खाल्ला, असेच त्याचे वर्णन करावे लागेल!!
राहुल गांधींचा जातीय प्रचार
काँग्रेसचे सुपरस्टार प्रचारक राहुल गांधी प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक सभांमध्ये जातनिहाय जनगणना, बीसी – ओबीसी यांचे हक्क, “जितनी जिसकी आबादी, उसकी उतनी हिस्सेदारी,” अशा घोषणा करत होते. ओबीसी अधिकाऱ्यांचे वाटेल ते मनःपूर्वक आकडे जनतेसमोर फेकत होते. जनतेत पेरलेले काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद देत होते.
प्रादेशिकांचे जात वर्चस्वाचे राजकारण
पण हे सर्व करताना राहुल गांधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरले, ती म्हणजे जातीचा राजकारणाचा मूळ अजेंडा हा काँग्रेसचा नव्हे, तर तो प्रादेशिक पक्षांचा आहे. लालूप्रसादांचे राष्ट्रीय जनता दल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मूलभूत आधार एकजातीय वर्चस्वाच्या राजकारणाचा राहिला आहे. यादव आणि मराठा हे राजकारण लालूप्रसाद आणि शरद पवार करत राहिले. अखिलेश यादव हे यादव + मुस्लिम कॉम्बिनेशनने पुढे गेले, तर मायावतींनी दलित + ब्राह्मण सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग केला. हे प्रादेशिक पक्षांनी केलेले प्रयोग मर्यादित अर्थाने यशस्वी ठरले आणि हे सगळे नेते बडे प्रादेशिक नेते म्हणून राजकारणात आपले स्थान टिकवू शकले.
इंदिरा गांधींची शिकवण विसरले
पण काँग्रेसचे बिलकुलच तसे नव्हते. उलट ज्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा वारसा राहुल गांधी सांगतात, त्यातल्या विशेषतः इंदिरा गांधींनी कायमच एकजातीय राजकारण किंवा जातीय समूहांचे राजकारण नाकारले आणि त्यांनी गरीब कल्याणाची भाषा वापरत सर्वजात समूहांवर आपले गारुड पसरवले होते. त्यात इंदिरा गांधी कमालीच्या यशस्वी झाल्या होत्या. काँग्रेससाठी “सर्वजातीय समावेशकता” हा फॉर्म्युला यशस्वी होतो, हे त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये दाखवून दिले होते. जातीजातींमध्ये भांडणे लावा, पण ती एकजातीय राजकारणात परिवर्तित करू नका, हा त्यांचा सुप्त संदेश होता. नेमका हाच संदेश राहुल गांधी विसरले आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या जातीच्या राजकारणाच्या अजेंड्यावर डल्ला मारून बसले.
जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व समावेशक हिंदुत्ववादी अजेंड्याला जातीच्या अजेंड्यातून परिणामकारक आव्हान देता येऊ शकेल, असा त्यांचा समज झाला आणि तिथेच त्यांचे चुकले. भारतात एकजातीय किंवा विशिष्ट जात समूहांचे राजकारण संकुचित मर्यादेपेक्षा यशस्वी होत नाही, हा इतिहासदत्त दाखला राहुल गांधींच्या लक्षातच आला नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना वगैरे आधी काँग्रेसनेच नाकारलेले मुद्दे राहुल गांधींनी प्रचारात पुढे रेटले. यातून आपण काँग्रेसची विश्वासार्हता गमावत आहोत, याचे भान त्यांना आणि त्यांच्या कच्छपी लागलेल्या नेत्यांना उरले नाही. हा काँग्रेसच्या प्रचारातला सर्वात मोठा अयब म्हणजे दोष ठरला.
पण राहुल गांधींसारख्या नेत्याला सांगणार कोण?? आणि त्यांच्या नादी लागणार कोण?? हा खरा प्रश्न होता. त्यामुळे कुणी त्यांना सांगायला गेले नाही आणि त्यामुळे त्यांनी कोणाचे ऐकण्याचा प्रश्नच उरला नाही. इथे काँग्रेस फसली आणि 3 राज्यांमध्ये मार खाऊन बसली!!
त्याउलट मोदींनी जातनिहाय जनगणना हा शब्द एकदाही न उच्चारला नाही. पण आपण ओबीसी पंतप्रधान आहोत हे जनतेच्या मनावर ते ठळकपणे ठसवू शकले. काँग्रेसच्या गॅरंटीला मोदींची गॅरंटी हे प्रत्युत्तर आणि त्याला जनकल्याण योजनांची जोड हे आवाहन मोदींनी केले. ते जातनिहाय जनगणनेच्या आवाहनाच्या पलीकडचे ठरले आणि त्यामुळेच ते यशस्वीही ठरले.
देशात चारच जाती : गरीब, युवक, महिला आणि शेतकरी
मोदींनी एका कार्यक्रमात जातनिहाय जनगणनेवर भाष्य करताना आपल्या दृष्टीने भारतात चारच जाती आहेत. गरीब, युवक, महिला आणि शेतकरी या जातींचे कल्याण हा आपला अजेंडा आहे असे जाहीररित्या बोलून दाखविले होते. त्यावर बवाल करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी केला. पण जनतेने 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्या नेत्यांना अशी काही चपराक हाणली, की काँग्रेसने प्रादेशिक जातीय अजेंड्यावर मारला डल्ला, 3 राज्यांमध्ये मार खाल्ला!! अशी परिस्थिती 3 डिसेंबर 2023 रोजी निर्माण झाली!!
Congress followed regional casteist politics and lost 3 states madhya Pradesh, rajasthan and chattisghar
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी