नाशिक : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; पण काँग्रेस आणि भाजप यांनी मात्र शाब्दिक खेळत अडकवली लढाई!! असला प्रकार राहुल गांधींच्या भाषणानंतर आज घडला.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरची 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये जिंकली. पाकिस्तानला आठ तासांमध्ये गुडघ्यावर आणले. पाकिस्तानी सैन्याला लढाई थांबवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना फोन करावा लागला याची सगळी कहाणी सीडीएस अनिल चौहान यांनी पुण्यात सांगितली.
पण त्याच वेळी राहुल गांधींनी भोपाळमध्ये भाषण करून ऑपरेशन सिंदूर मधल्या भारतीय सैन्याच्या कामगिरीवर शाब्दिक बोळा फिरवला. “नरेंदर – सरेंडर” अशी शाब्दिक चमत्कृती करत भारतीय सैन्याचे यश कमी लेखले. तिकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला. म्हणाले, नरेंदर, हो जाओ सरेंडर. लगेच नरेंद्र मोदी सरेंडर झाले. संघ आणि भाजपचा इतिहास मला माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांना सरेंडरच्या चिठ्ठ्या लिहिण्याची सवय आहे. संघ आणि भाजप वर थोडा जरी दबाव आणला, तरी ते लगेच झुकतात हे मला माहिती आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. 1971 च्या युद्धात अमेरिकेतून फोन कॉल आला नाही. त्यांनी विमानवाहू युद्धनौकेचा सातवा बेडा पाठविला. पण इंदिरा गांधी अमेरिकेपुढे झुकल्या नाहीत. मला जे करायचे ते मी करणार हे इंदिरा गांधींनी अमेरिकेला सांगितले. त्यांनी पाकिस्तान तोडला, असे राहुल गांधी म्हणाले. या सगळ्या वक्तव्यातून राहुल गांधींनी टीका नरेंद्र मोदींवर केली, पण त्यामुळे भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचा अपमान झाला.
भाजपच्या प्रवक्त्यांनी राहुल गांधींच्या टीकेवर लगेच प्रत्युत्तर दिले. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी यांच्यातल्या कराराचा फोटो शेअर केला. त्याच्या वरती नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करून “थंडर” असे शीर्षक दिले. काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या फोटोवर “ब्लंडर” असे शीर्षक दिले. हा प्रकार करून भाजपने काँग्रेसला डिवचले.
वास्तविक 1971 चे युद्ध असो किंवा ऑपरेशन सिंदूर असो, ते यशस्वी केले भारतीय सैन्याने. पण काँग्रेस आणि भाजप यांनी त्यावर शाब्दिक लढाई खेळून भारतीय सैन्याच्या कामगिरीला उणेपण आणले. राहुल गांधींनी जितक्या उथळपणे टीका केली, तितक्याच उथळपणे भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिले.
1971 च्या युद्धाच्या वेळी इंदिरा गांधींनी बांगलादेशाची निर्मिती केल्यानंतर स्वतःहून युद्ध थांबविले होते. भारतीय सैन्याने जिंकलेला पाकिस्तानचा भूप्रदेश इंदिरा गांधींनी पाकिस्तानला परत करून टाकला होता. पाकिस्तानचे 93 हजार कैदी त्यांना परत करून टाकले होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या जनसंघाने इंदिरा गांधींच्या त्या निर्णयावर टीका केली होती. भारतीय सैन्याने युद्धात जे कमावले, ते इंदिरा गांधींनी तहामध्ये गमावले, अशी टीका जनसंघाने केली होती.
आता देखील ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा यशस्वी केल्यानंतर भारतीय सैन्याने प्रत्यक्ष कारवाई थांबवली. पण सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविले. पण या सगळ्यातून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय राजकीय पक्षांनी शाब्दिक लढाई करून आपला उथळपणाच सिद्ध केला.
Congress – BJP lock horns over operations sindoor
महत्वाच्या बातम्या
- Aam Aadmi Party : ‘इंडि’ आघाडी तुटण्यास सुरुवात; ‘आप’ने घेतला मोठा निर्णय!
- Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी दिले संकेत
- Sheikh Mujibur Rahman : बांगलादेश सरकारकडून हिंदूंना खूश करण्याचा प्रयत्न, आता घेतला ‘हा’ निर्णय!
- राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!