भारताने पाकिस्तानात वाहणारे सिंधू नदीचे पाणी रोखले, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखेल आणि भारताची कोंडी करेल, अशी धमकी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी दिली, पण असल्या पोकळ धमकीकडे भारतीय राज्यकर्त्यांनी बिलकुल लक्ष दिले नाही. कारण पाकिस्तानी धमकी मध्ये पोकळ शब्दांच्या गोळीबाराखेरीज दुसरे काही नाही, तर फक्त चिनी बागुलबुवा आहे.
वास्तविक भारतातून उगम होऊन पाकिस्तानात वाहणारी सिंधू आणि चीन मधून उगम होऊन भारतात वाहणारी ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांच्या भौगोलिक स्वरूपामध्ये फार मोठा फरक आहे. पाकिस्तानात वाहणारी सिंधू भारतामध्ये उगम पावते. तिच्या पाण्यापैकी फक्त 20 % पाण्याचा वापर भारत करतो. 80 % पाण्याचा वापर भारत पाकिस्तानला करू देतो, ही सिंधू जल कराराची “कृपा” नेहरूंनी पाकिस्तान वर केली, तसे ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या वापराबाबत झालेले नाही. सिंधू नदीचा उगम आणि तिच्या पाण्याचा वापर तसेच ब्रह्मपुत्रा नदीचा उगम आणि तिच्या पाण्याचा वापर यांच्यात मूलभूत तफावत आहे. ब्रह्मपुत्रा नदी जरी चीनमध्ये उगम पावत असली तरी एकूण ब्रह्मपुत्रेच्या पाण्यापैकी फक्त 30 ते 35 % पाणी चीन मधून वाहते. ते सुद्धा तिबेट मधल्या मर्यादित पावसाने आणखी मर्यादित होते.
त्या उलट उरलेली 65 ते 70 % ब्रह्मपुत्रा भारतातून वाहते आणि पूर्वेकडेच्या 7 राज्यांमध्ये पडणाऱ्या मान्सूनच्या मुसळधार पावसाच्या पाण्यावर ती भरभरून वाहत राहते. पूर्वेकडच्या 7 राज्यांमधल्या तब्बल 9 उपनद्या ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळतात. त्यामुळे भारतात ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र विशाल आणि अतिविशाल होत राहते. या सगळ्याला चीन आणि भारत यांच्यातली मूलभूत भौगोलिक परिस्थितीतील भिन्नता कारणीभूत आहे. चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी भारताला कुठल्या कराराच्या “कृपेने” देत नाही, तर ब्रह्मपुत्रा मूळातच भौगोलिक परिस्थितीमुळे भारतात विस्तारते आणि तिचे पाणी भारत हक्काने वापरतो, ही यातली वस्तुस्थिती आहे.
35 % वाले चिनी
चीनने ब्रह्मपुत्रेवर थ्री गॉर्जेस धरण बांधून तिचे पाणी कितीही अडवायचा प्रयत्न केला, तरी त्या पाण्याचे एकूण प्रमाण 30 ते 35 % पेक्षा जास्त होऊ शकणार नाही आणि भारतामध्ये 9 उपनद्या जाऊन ब्रह्मपुत्रा नदीला मिळत असल्याने ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे अटू शकणार नाही. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राच्या रुंदी मध्ये कमी जास्त प्रमाण झाले, तरी त्यातही फार मर्यादा राहील. कारण ब्रह्मपुत्रा ज्या प्रदेशांमधून वाहते, त्या प्रदेशांची भौगोलिक रचना मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल आणि उपनद्यांच्या पाणी वाहण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही धमक्या दिल्या आणि ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवण्याचा चीनचा कितीही मोठा इरादा असला तरी त्यामुळे त्याचा भारतावर फार मोठा परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही.
पाकिस्तानचे वाळवंटीकरण
त्या उलट भारताने सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचे पाणी अडवल्यावर पाकिस्तानात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन त्यांच्या पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात अक्षरश: वाळवंटीकरण होण्याचा धोका आहे. कारण या तिन्ही नद्यांचा उगम भारतात होऊन त्यांचा सर्व पाणीसाठा भारतातून पाकिस्तान मध्ये पोहोचतो. पाकिस्तानात कुठल्या मोठ्या उपनद्या या मोठ्या नद्यांच्या पाण्याचे भरण पोषण करत नाहीत. त्यांची पात्रे पाकिस्तानात विस्तारत नाहीत. त्यामुळे सिंधू जल करार स्थगित करून भारताने पाकिस्तानचा खऱ्या अर्थाने गळा आवळला आहे. आणि त्या आवळलेल्या गळ्यातून भारताला धमक्या देण्याचा प्रकार पाकिस्तानने सुरू केलाय, त्यापलीकडे चीन ब्रह्मपुत्राचे पाणी आडवेल या धमकीला कुठलाही अर्थ नाही.
China can’t weaponise Brahmaputra water against India beyond certain limits
महत्वाच्या बातम्या
- Aam Aadmi Party : ‘इंडि’ आघाडी तुटण्यास सुरुवात; ‘आप’ने घेतला मोठा निर्णय!
- Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी दिले संकेत
- Sheikh Mujibur Rahman : बांगलादेश सरकारकडून हिंदूंना खूश करण्याचा प्रयत्न, आता घेतला ‘हा’ निर्णय!
- राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!