वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता आहे. त्याच वेळी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या केवळ १५ लाख रुपये संपत्तीसह देशातील इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत सर्वात ‘गरीब’ आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, राज्यांच्या विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता ५२.५९ कोटी आहे. या ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती १,६३० कोटी रुपये आहे. यापैकी दोनच महिला अाहेत. त्या म्हणजे बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या आतिशी. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १३.२७ कोटींची मालमत्ता आहे. एकूण ३१ मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तांचा विचार केल्यास त्यात फडणवीस यांचा क्रमांक १२ वा लागतो.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
३१ पैकी एक मुख्यमंत्री १०वी पास, १० पदवीधर
देशातील १० मुख्यमंत्री बॅचलर आणि ९ मास्टर्स पास आहेत. तर, तिघे १२वी आणि एक १०वी उत्तीर्ण दोन मुख्यमंत्र्यांकडे डॉक्टरेट पदवी आहे. सर्व मुख्यमंत्र्यांचे सरासरी उत्पन्न हे देशातील प्रतिव्यक्तीच्या उत्पन्नाच्या ७.३ पट आहे.
३१ पैकी १३ म्हणजे ४२% मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. फडणवीसांवर ४ आहेत. १० जणांंवर (३२%) खुनाचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरीसारखे गंभीर गुन्हे आहेत.
अरुणाचलचे पेमा खांडू ३३२ कोटींच्या संपत्तीचे मालक, श्रीमंतीत दुसऱ्या स्थानी
अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू हे ३३२ कोटींच्या संपत्तीसह दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकचे सिद्धरामय्या हे ५१ कोटींहून अधिक संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर. खांडू यांच्यावर सर्वाधिक १८० कोटींची देणी आहेत. सिद्धरामय्या यांच्याकडे २३ कोटी रुपये थकीत आहेत. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर १० कोटी रु. पेक्षा जास्त कर्ज आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ५५ लाख रुपयांच्या संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजे ममतांनंतर दुसरे ‘गरीब’ आहेत. पिनारायी विजयन ११८ कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर.