प्रतिनिधी
मुंबई – रमजानचा महिना आजपासून सुरू होत असल्याने दक्षिण मुंबईतील मशिदीत दिवसातून पाच वेळा ५० जणांच्या उपस्थितीत नमाज पठणाची परवानगी देण्याची जुम्मा मशीद ट्रस्टची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना फैलावाची सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अशी परवानगी देण्यात येऊ शकत नाही, असा तीव्र विरोध ठाकरे – पवार सरकारने न्यायालयात दर्शविला. bombay hi court rejects demand of group namaz in jumma majid in south mumbai
त्यामुळे या तातडीच्या याचिकेचा विचार करू नये, अशी विनंती राज्य सरकारतर्फे न्यायालयाला करण्यात आली. यानंतर राज्य सरकारने जारी केलेले नियम कायम राखत कोर्टाने ही परवानगी नाकारली आहे.
‘सध्याची कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची परिस्थिती भीषण आहे. म्हणूनच राज्य सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि ब्रेक दी चेन अंतर्गत प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांचे आरोग्य हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा संवेदनशील आणि खडतर परिस्थितीत याचिकादारांना सामूहिक नमाज पठणचे आयोजन करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही’, असे न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे.
एकीकडे राज्यात कलम १४४ लागू होत असताना असा जमाव जमविणे हेच बेकायदा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.