वृत्तसंस्था
लखनौ – उत्तर प्रदेशमधील सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अन्य राजकीय पक्ष चाचपडत असताना रणनिती आखण्यात भाजपने कधीच आघाडी घेतली असून आता प्रत्यक्ष कार्यवाहीलाही सुरुवात झालेली आहे. BJP way ahed in campaigning in UP
त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या ४० मंत्र्यांना टास्क दिले आहे. त्यांनी जन आशीर्वाद यात्रांचे आयोजन करावे असा आदेश पक्षाने दिला आहे.
या महिन्याच्या प्रारंभी उत्तर प्रदेशातील सात मंत्र्यांना केंद्रात संधी मिळाली. पंकज चौधरी, एस. पी. सिंग बघेल, भानुप्रताप सिंह वर्मा, बी. एल. वर्मा, अजय मिश्रा, कौशल किशोर यांच्यासह अपना दलाच्या अनुप्रिया सिंह पटेल मंत्री बनले. यातील प्रत्येकी तीन जण इतर मागासवर्गीय व अनुसूचित जातींमधील आहेत, तर एक जण ब्राह्मण आहे. यामुळे जातीचे समीकरण आपोआप जुळेल.
जन आशीर्वाद यात्रांना १६ ऑगस्टपासून प्रारंभ होईल. कोविड सूचनांचे पालन करून त्याचे आयोजन करावे असेही आवर्जून सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सात मंत्र्यांना राज्यातील खासदारांनी मदत करावी असा आदेशही देण्यात आला.