विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ‘भाजपा केवळ निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मने जिंकण्याचे मिशन आहे, असा नवा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. BJP is not election winning machine, but has mission of winning people mind, says PM narendra modi
भाजपाच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मागील वर्षी कोरोनाने अभूतपूर्व संकट उभे केले तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी सुख-दुःख विसरून देशवासियांची सेवा केली आहे. ‘सेवा हेच संघटन’ याचा संकल्प केला आणि त्यासाठी काम केले. गांधीजी म्हणायचे समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला लाभ होईल तेच निर्णय आणि योजना आहे. गांधींजींच्या त्याच भावनेला पूर्ण करण्यासाठी आपण परिश्रम घेत आहोत,” असे मोदी म्हणाले.
प्रादेशिक पक्षही कुटुंबांपुरते मर्यादित
मोदी म्हणाले, की घराणेशाहीचे काय हाल झाले आहेत? हे नवा भारत बघत आहे. प्रादेशिक पक्षही कुटुंबांच्या नेतृत्वापुरते मर्यादित झाले आहेत. या पक्षांनी समाजवादाचा बुरखा पांघरलेला होता. तो फाटला आहे. त्यांच्या समाजवादाचा अर्थ मूठभर लोकांसाठी योजना आणि व्होट बॅंक तयार करण्यासाठी धोरणे आखणे इतकाच होता. हेच पक्ष आता कृषी कायदे आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत,” अशी टीका मोदी यांनी केली.
सरकारच्या मूल्यमापनाचे निकषच बदलले
आमच्या सरकारचे मूल्यमापन लोकांना दिल्या जाणार लाभावरून केले जातेय. देशातील सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याचा हा नवा मूलमंत्र बनला आहे. तरीही भाजपा निवडणूक जिंकली की, तर भाजपाला निवडणूक जिंकण्याचे मशीन म्हणायचे आणि इतर पक्ष निवडणूक जिंकले तर त्यांचे कौतूक करायचे… भाजपला निवडणूक जिंकण्याची मशीन म्हणणाऱ्या लोकांना लोकशाहीची परिपक्वता समजलीच नाही. या लोकांना भारतीयांच्या आशा अपेक्षांना समजत नाहीये. भाजपा सत्तेत असो वा विरोधी बाकांवर जनतेशी नाळ कायम ठेवली आहे. कार्यकर्ते भाजपाला ताकद देतात. जनतेमध्ये राहून काम करतात. पक्षाची ताकद वाढवतात. आपले आचरण आणि प्रयत्नांनी भाजपा कार्यकर्ते जनतेचे मन जिंकण्याचे काम अविरतपणे करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपा आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असे मोदी यांनी सांगितले.