आज लोकसभेच्या अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदान संपल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल येण्यास सुरुवात होईल. पण टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नसल्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या या निर्णयाचा समाचार घेतला.Amit Shah criticized Congress decision not to participate in exit poll discussions
अमित शाह म्हणाले की, काँग्रेस दीर्घकाळापासून नकाराच्या स्थितीत आहे. त्यांना पूर्ण बहुमत मिळेल असा प्रचार ते करत राहिले, पण आगामी एक्झिट पोलमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते. त्यामुळे ते मीडियाला सामोरे जाऊ शकत नाहीत आणि एक्झिट पोलवर बहिष्कार टाकत आहेत.
तसेच काँग्रेसला आपल्या दारुण पराभवाची जाणीव झाली आहे, मग आता कोणत्या चेहऱ्याने मीडिया आणि जनतेला सामोरे जायचे? त्यामुळे काँग्रेस एक्झिट पोलपासून दूर पळत आहे. मला काँग्रेस पक्षाला सांगायचे आहे की, पळून जाऊ नका, पराभवाला सामोरे जा आणि आत्मपरीक्षण करा.
19 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया आज 1 जून रोजी 57 जागांवरील मतदान पार पडल्यानंतर संपणार आहे. या शेवटच्या टप्प्यात पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि झारखंडमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.