वृत्तसंस्था
मुंबई : बदलापूरच्या ( Badlapur ) शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने या प्रकरणी शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यभरातील शाळांमध्ये कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समित्यांमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींचा समावेश असेल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. शाळेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या घटनेचे बदलापुरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तातडीची पत्रकार परिषद बोलावून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल, असे ते म्हणाले.
आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा, अटकेची कारवाई
बदलापूरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी शालेय शिक्षण विभागाची बैठक बोलावली आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाईल. आरोपी अक्षयवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, मी त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, असे केसरकर म्हणाले.
सर्व शाळांमध्ये विशाखा समिती
दीपक केसरकर म्हणाले, सरकार या प्रकरणी कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करेल. त्यात नववी व दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींचा समावेश असेल. या प्रकरणी मी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. घटना घडलेल्या शाळेतील सीसीटीव्ही बंदावस्थेत आढळलेत. त्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल.
दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेत राहावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या, या शाळेत ही समिती होती की नाही याची माहिती घेतली जाईल. मुलींच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे आदेश दिल्यानंतरही सखी सावित्री समिती स्थापन झाली नसेल आणि त्याचा परिणाम मुलींवर होणार असेल, तर संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल.
अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येक शाळेत सखी सावित्री स्थापन झाली तर मुलींना दिलासा मिळेल. पोस्को कायद्यानुसार प्रत्येत शाळा व वसतिगृहात तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. यापुढे सर्वच शाळांसाठी विशाखा समिती अनिवार्य असेल. ही समिती मोठ्या विद्यार्थिनींसाठी असेल. याचा निर्णय आजच घेतला जाईल. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे दीपक केसरकर म्हणाले.
मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षिकांवर कारवाई
शालेय शिक्षण मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, ही घटना 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडली. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी यासंबंधीची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पीडित कुटुंबाची तक्रार घेण्यास 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप आहे. त्यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. शाळेलाही नोटीस बजावण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
after Badlapur incident Visakha committee will be formed in all schools
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
- ‘कोलकाता बलात्कार पीडितेचा फोटो आणि ओळख सोशल मीडियावरून ताबडतोब हटवा’
- Ajmer gang rape case : अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व सहा दोषींना जन्मठेप!
- Assam : भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन बांगलादेशींना आसाम पोलिसांनी पकडले