विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी त्याचे मतदान होत आहे. पण विधानसभेच्या दृष्टीने प्रचाराची सुरुवात फार पूर्वीच झाली आहे. किंबहुना भाजप आणि काँग्रेस यांच्या द्विपक्षीय संघर्षात घुसून तिथली विधानसभा निवडणूक त्रिपक्षीय करण्याचा धडपडाट अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने चालवला आहे. Aam Aadmi Party’s attempt to make the election tripartite by entering the BJP-Congress conflict in Gujarat
अरविंद केजरीवाल यांचे 3 दौरे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2 दौरे आधीच करून घेतले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणूक घोषित होण्याची औपचारिकताच शिल्लक होती, ती आज पूर्ण झाली आहे.
30 वर्षांमध्ये भाजप काँग्रेस टक्कर
पारंपारिक दृष्ट्या गुजरात मध्ये निदान गेल्या 25 ते 30 वर्षात भाजप आणि काँग्रेस असा द्विपक्षीय संघर्ष राहिला आहे. त्यातही नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे 2001 नंतर गुजरात विधानसभेची निवडणूक गेल्या 22 वर्षांमध्ये भाजप कधी हरलेला नाही. काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण एखाद दुसरी निवडणूक वगळता काँग्रेसचे मनोधैर्य फारसे खचलेले नाही, ही देखील राजकीय वस्तुस्थिती आहे. किंबहुना 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जबरदस्त टक्कर दिल्याचे चित्र दिसले होते. भाजपचा आकडा 20 वर्षांमध्ये प्रथमच 100 च्या खाली म्हणजे 99 वर आला होता. हे काँग्रेस नेतृत्वाचे राजकीय कर्तृत्व होते.
पण गेल्या 5 वर्षांमध्ये ही स्थिती बदलली असून खुर्द काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत. माजी परराष्ट्रमंत्री माधव सिंह सोळंकी यांचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोळंकी यांचे एक खासगी प्रकरण मध्यंतरी फारच गाजले. त्याचा राजकीय परिणाम काँग्रेसला भोगाव लागला आहे. इतकेच नाही तर काँग्रेस मधला भरत सिंह सोळंकी विरोधी गट त्यामुळे प्रबळ बनला आहे. हार्दिक पटेलने देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून पक्षाला धक्का दिला आहे. आता पक्षाची सर्व मदार ओबीसी नेता जिग्नेश मेवाणी याच्यावर आहे.
पण गुजरात मधल्या राजकीय संघर्षात आम आदमी पार्टीने दमदार एन्ट्री करून खऱ्या अर्थाने आव्हान काँग्रेस पुढेच उभे केले आहे. हा एक प्रकारे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाच राजकीय पॅटर्न दिसतो आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये जशा तोंडी तोफा भाजपवर डागल्या आणि प्रत्यक्षात काँग्रेस फोडली, तसेच काहीसे अरविंद केजरीवाल गुजरात मध्ये करत आहेत. गुजरात मध्ये ते भाजपवर शरसंधान साधत आहेत, पण अजून त्यांनी काँग्रेसला हात घातलेला नाही. शिवाय काँग्रेसचे संघटन बंगाल मधल्या संघटना संघटने इतके कमकुवत देखील नाही पण अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न मात्र गुजरात मधला भाजप विरुद्ध काँग्रेस हा द्विपक्षीय संघर्ष त्रिपक्षीय अवस्थेत खेचण्याकडे दिसतो आहे. सुरत सारख्या शहरी भागामध्ये आम आदमी पार्टीला चांगले यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच विधानसभेचे 50 पेक्षा जास्त उमेदवार त्यांनी फार पूर्वीच जाहीर करून त्यांना प्रचाराच्या कामाला देखील लावले आहे.
केजरीवालांचा कांशीराम पॅटर्न
कांशीराम पॅटर्ननुसार ही निवडणूक अरविंद केजरीवाल हरण्यासाठी लढणार असले तरी दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला नामोहरम करण्याची उत्तम संधी त्यांना आहे आणि याचाच धोका काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर वाटतो आहे. एकदा काँग्रेस पक्षाला दुसऱ्या क्रमांकावरून खाली खेचण्याचा प्रयत्न यशस्वी झाला की मग पुढच्या निवडणुकीत किंवा त्या पुढच्या निवडणुकीत भाजप सारख्या सत्ताधारी बळकट पक्षाला पर्याय देण्याचे मनसुबे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी असू शकतात या दृष्टीने महत्त्वाची आहे.
शिवाय राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आजमावलेला टेम्पल रन अर्थात सॉफ्ट हिंदुत्वाचा पॅटर्न अरविंद केजरीवाल गुजरात मध्ये नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिमा छापण्याची मागणी करून राबवताना दिसत आहेत. राहुल गांधींचा टेम्पल रन अर्थात सॉफ्ट हिंदुत्वाचा पॅटर्न काँग्रेसला लोकसभेच्या 10 जागा वाढीव देऊन गेला, पण अरविंद केजरीवालांचा लक्ष्मी + गणेश नोटांचा सॉफ्ट हिंदुत्वाचा पॅटर्न त्यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत कितपत यश देईल?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Aam Aadmi Party’s attempt to make the election tripartite by entering the BJP-Congress conflict in Gujarat
महत्वाच्या बातम्या
- 75000 रोजगार संकल्प : महाराष्ट्रात आज 3 नोव्हेंबरला सर्व विभागांमध्ये पहिले रोजगार मेळावे
- रशियाकडून भारताची तेल खरेदी : स्टुडिओत बसून खोटे नॅरेटिव्ह सेट करू नका; हरदीप सिंह पुरींनी सीएनएन अँकरला सुनावले
- नोकरीची संधी : केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात मोठी भरती; लवकर करा अर्ज
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा