वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने चीनला लागून असलेल्या एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, सध्या पश्चिम सीमेवर तैनात हे 10 हजार जवान उत्तराखंड व हिमाचल प्रदेशच्या चीनलगतच्या 532 किमी लांब सीमेवर तैनात होतील.10 thousand more Indian soldiers deployed on LAC; Patrolling will be increased along the 532 km Himachal-Uttarakhand border with China
दरम्यान, या निर्णयामुळे चीन खवळला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, सीमेवर भारताने अतिरिक्त जवानांची तैनाती केल्याने दोन्ही देशांतील तणाव कमी होणार नाही. सीमाभागात दोन्ही देशांत अंतर्गत विश्वास गरजेचा आहे. उल्लेखनीय म्हणजे 2020च्या गलवान संघर्षानंतर भारताने चीनसोबत 21 फेऱ्यांची चर्चा केली आहे. मात्र, काहीच होऊ शकले नाही.
उत्तर भारत युनिट आता फायटिंग कमांड, सध्या तीन डिव्हिजन, आणखी वाढणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेली मुख्यालय असलेल्या उत्तर भारत (यूबी) युनिटचे आता फायटिंग कमांडमध्ये रूपांतर केले जात आहे. यूबी हे शांतिकाल लोकेशन आणि प्रशिक्षण युनिट म्हणून काम करत होते. सध्या यातील प्रत्येकी 18 हजार जवान असलेल्या तीन डिव्हिजन आहेत. असे म्हटले जात आहे की, फायटिंग कमांडनंतर डिव्हिजन वाढवल्या जाऊ शकतात.
का केली अतिरिक्त तैनाती?
चीनच्या ताब्यातील तिबेटच्या सीमेलगतची राज्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गत १० वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये ऑलवेदर रोड, मोठी धरणे आणि पूल-बोगद्यांचा समावेश आहे. आगामी काळात पायाभूत सुविधांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय देशामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना धार्मिक टुरिस्ट सर्किट म्हणून केंद्र सरकारकडून चालना दिली जात आहे. या प्रकल्पांतर्गत अनेक प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हिमाचल आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांच्या सीमेवर अतिरिक्त गस्त वाढवणे आवश्यक ठरत आहे, या सर्वांचा विचार करून सीमेवर तैनातीचा निर्णय झाला.