विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना साथीला २१ महिने पूर्ण झाले आहेत. या दरम्यान महाराष्ट्रात ६६ लाख लोक या विषाणूच्या विळख्यात सापडले. त्यापैकी या आजाराचा सर्वाधिक फटका २१ ते ५० वयोगटातील तरुण आणि प्रौढांना बसला आहे. एकूण बाधितांपैकी ५८ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत.
राज्यात पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन शिथिल केल्यावर तरुण आणि प्रौढ व्यक्ती नोकरी, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. धोका असूनही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. Young peoples get corona fast in Maharashtra
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबरपर्यंत राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६६ लाख ७० हजार ४४१ इतकी आहे. त्यापैकी २१ ते ३० वयोगटातील ११ लाख ९३ हजार ४६६, ३१ ते ४० वयोगटातील १४ लाख ८१ हजार ३७४ आणि ४१ ते ५० वयोगटातील ११ लाख ९० हजार १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे २१ ते ५० वयोगटातील बाधितांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे.
तरुण आणि वृद्धांच्या तुलनेत कोरोनाचा मुलांवर थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे, तरीही एकूण संक्रमित रुग्णांपैकी ११ टक्के रुग्ण हे ० ते २० वयोगटातील आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ० ते १० वयोगटातील दोन लाख १२ हजार ६१७ किशोरवयीन आणि ११ ते २० वर्षे वयोगटातील चार लाख ९७ हजार ४८६ मुलांना या आजाराची लागण झाली.