वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. We do not have enough vaccine doses at various vaccination centres rajesh tope
मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही सूचना केल्या.
ते म्हणाले की केंद्र सरकार लस पाठवत नाही असे नाही पण पुरवठ्याचा वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोलले जाते त्या पद्धतीने कृती केली जात नाही हे केंद्र सरकारला आमचे हे सांगणे आहे, अशी टिपण्णी राजेश टोपे यांनी केली.
यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना लॉकडाऊन शब्द वापरू नका, असे आवाहन केले. केवळ शनिवारी व रविवारी लॉकडाउन आहे.. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. गरज लागल्यास ऑक्सिजनचे प्रमाण इंडस्ट्रीसाठी शून्य करून टाकू, ऑक्सिजनचा लागणारे स्टीलचे प्लांट बंद ठेवू…पण ऑक्सिजन कमी पडू देणार नाही,” असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. थोडी जरी लक्षणे जाणवली तर लगेच चाचणी करुन घ्या. अंगावर दुखणे काढू नका, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.
राजेश टोपे म्हणाले, की “प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितले. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असे सांगण्यात आले. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असे सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.