महाराष्ट्रातील पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर पसरली शोककळा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं आज(२५ जुलै) वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती, दरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. Veteran writer, journalist and storyteller Shirish Kanekar passed away
रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूळ रहिवासी असलेल्या शिरीष कणेकरांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं होतं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी केलं. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत.
आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण आणि समस्यावर विनोदी शैलीतून बोट ठेवणाऱ्या शिरीष कणेकरांचं सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवरील लेखन प्रसिद्ध होतं. तर माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तकं आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले होते. शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
यादो की बारात, शिरीषासन, कणेकरी, फिल्लमबाजी, कल्चर व्हल्चर सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, या नावांनी ते स्तंभलेखन करत. कधीही दारु न प्यायलेला बेवडा या शीर्षकाने त्यांनी लिहिलेला केश्तो मुखर्जींवरचा लेख आजही वाचकांच्या स्मरणात आहे. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.
Veteran writer journalist and storyteller Shirish Kanekar passed away
महत्वाच्या बातम्या
- आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम जामीन मंजूर, मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप
- गडकरी म्हणाले- मतदार हा हुशार आहे, लोभी नाही; घरोघरी मटण वाटले, तरीही आम्ही निवडणूक हरलो
- मणिपूरवर चर्चा न झाल्याने जया बच्चन संतापल्या, नेत्यांनी चर्चा न करणे लाजिरवाणे असल्याची टीका
- पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!! घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!