प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बंडखोर आमदारांवर शेलक्या शब्दांत मध्ये तोंडसुख घेत असताना दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर मात्र संयमाने आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतल्या बदलावर अचूक बोट ठेवले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची तडजोड करायला तयार होते. पण पवार आडवे आले, असे परखड वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे. Shivsena splits : Uddhav Thackeray was ready for compromise with rebellion MLAs but sharad Pawar interrupted, says Deepak kesarkar
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढतच चालला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे भाषण दिवसेंदिवस शिवराळ होत चालले आहे. त्याच वेळी दीपक केसरकर यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. नाराज आमदार दीपक केसरकर यांनी एक खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांना भेटण्याआधी नाराज आमदारांशी तडजोड करण्यास तयार होते. पण पवारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर, मात्र ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. संजय राऊत यांच्यावर देखील केसरकरांनी निशाणा साधला आहे.
चुकीच्या सल्लागारांमुळे शिवसेना अडचणीत
आमदारांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा सुरुवातीला शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना भावनिक आवाहन देखील केले होते. मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे, मात्र बंडखोरांनी समोर येऊन मला तसे सांगावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले.
यावर बोलताना, केसरकर म्हणाले की सुरुवातीला उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते. मात्र शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. चुकीचे सल्ले देणा-यांमुळेच आज शिवसेना अडचणीत आल्याचे केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.