विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले. योगी सरकारच्या या कारवाईचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतूक केले आहे.Raj Thackeray thanked Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath for removing the loudspeaker
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ”उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदिंवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असे त्यांनी पत्रकात म्हटलं.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.