विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन. त्यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठी बांधवांना उद्देशून एक पत्र लिहिलयं. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा , असे सांगत त्यांनी सर्व मराठी एकत्र असू तर सर्वत्र मराठी करायला विलंब लागणार नाही, असेही नमूद केलंय. On Marathi Gaurav Day, Raj Thackeray appeals to Marathi Manoos
राज ठाकरेंचे पत्र आहे तस…
“सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !
कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती.
पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.
असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे.
मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.
मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा !”
On Marathi Gaurav Day, Raj Thackeray appeals to Marathi Manoos
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले म्हणाले- शिवसेनेच्या समस्यांना उद्धव ठाकरेच जबाबदार, राहुल गांधी मजबूत नेते नाहीत
- द फोकस एक्सप्लेनर : काय आहे दिल्ली मद्य घोटाळा? सिसोदियांना नेमकी का झाली अटक, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- ‘भाजप आणि ओवेसी राम-श्यामची जोडी…’, संजय राऊत यांची टीका, एआयएमआयएमला म्हणाले – वोट कटिंग मशीन