विशेष प्रतिनिधी
मुंबई : अतानू दास आणि दीपिका कुमारी यांनी विवाहानंतरच्या पहिल्याच विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ग्वाटेमालातील स्पर्धेत या दोघांना मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती, पण त्याची भरपाई त्यांनी वैयक्तिक स्पर्धेतील सुवर्णवेध घेऊन केली. Husband and wife’s golden performance in the first competition after marriage
गतवर्षी जूनमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर अतानूने आम्ही प्रवास, सराव एकमेकांसह करतो आणि स्पर्धा सहभागी होतो तसेच एकाच वेळी जिंकतोही, असे सांगितले होते. तेच ग्वाटेमालात घडले. स्वप्न प्रत्यक्षात आल्याचीच भावना आहे. गेली काही वर्षे या सुवर्णपदकाचे स्वप्न बाळगले होते. ते आता साध्य झाले आहे, असे अतानूने सांगितले. त्याने पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेत बाजी मारली.
दीपिकाने तिसरे विश्वकरंडक सुवर्णपदक जिंकले. दीर्घ कालावधीनंतर अंतिम फेरीची लढत खेळत होते. या यशाचा आनंद आहे तसेच काहीशी नर्व्हसही आहे. या यशामुळे आगामी स्पर्धेत जास्त चमकदार कामगिरी करण्यास मी प्रेरितही झाले आहे असे तिने सांगितले. भारताने या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली.
पात्रतेत तिसरी आलेली दीपिका अखेरच्या दिवशी आव्हान कायम असलेल्यांत सर्वोत्तम मानांकन असलेली होती. अंतिम फेरीच्या वेळी हृदयातील धडधड वाढली होती. त्याकडे दुर्लक्ष करणेच जास्त अवघड होते, असे दीपिकाने सांगितले.