प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत दररोजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधत असताना या दोन नेत्यांनी मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे ठरवल्याचे दिसत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना “लवंडा” म्हणून असल्या “लवंड्यांवर” मी बोलत नाही, असे सांगून त्यांच्याविषयीचा प्रश्न झटकून टाकला होता. Devendra Fadnavis also slammed Sanjay Raut for being “useless”
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांना “बिनकामाचे” म्हणून त्यांच्याविषयीचा प्रश्न झटकून टाकला.
संजय राऊत यांनी भाजपने दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही दंगल घडवण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप केला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना आता काही कामधंदा राहिलेला नाही, त्यामुळे ते नैराश्यात गेले आहेत. त्यांच्यावर काय बोलायचे, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या विषयाकडे दुर्लक्ष केले.
रामनवमीच्या दिवशी देशातील अनेक भागात हिंसाचार झाला, विशेष म्हणजे जेथे जेथे निवडणुका आहेत, त्या राज्यांत या दंगली घडवण्यात आल्या, तसे महाराष्ट्रातही भाजपने दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत अतिशय फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहेत. त्यांना सध्या काही कामधंदा उरलेला नाही. त्यांच्यावर कितीवेळा बोलायचे?, अशी बोचरी टीका केली.
– 2024 ला कोल्हापूर भाजप जिंकणार
कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केले. निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही एकटे लढूनही आमच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आमच्याविरोधात तीन पक्ष एकत्र होते, तरी देखील त्यांची मते वाढली नाहीत. कोल्हापूरमध्ये सहानुभूतीमुळे काँग्रेसचा विजय झाला. पण 2024 मध्ये कोल्हापूरची ही जागा आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– राज यांचे स्वागतच
अयोध्येचा दौरा कुणीही करू शकतो. प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्यांचे स्वागतच आहे. आम्ही देखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावे वाटत असेल, तर त्यात गैर काही नाही. श्रीरामाचे भव्य मंदिर तिकडे होत आहे, ते पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, असे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौराविषयी म्हणाले.