राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून गाजलेल्या अधिवेशनात भाजपच्या निलंबित १२ आमदारांचा विषयही चर्चेत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, कुणी जर चुकलं, तर त्याला चार तास बाहेर ठेवा. चार तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा-बारा महिने कुणाला बाहेर पाठवू नका! Winter Session Ajit Pawar With BJP in 12 MLA Suspention, Says Dont send anyone out for 12 months at once
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून गाजलेल्या अधिवेशनात भाजपच्या निलंबित १२ आमदारांचा विषयही चर्चेत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, कुणी जर चुकलं, तर त्याला चार तास बाहेर ठेवा. चार तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा-बारा महिने कुणाला बाहेर पाठवू नका!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना हे आवाहन केलंय. मागच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झाले आहे. हे निलंबन मागे घेण्याची भाजपची मागणी आहे. आता अजित पवारांनी सभागृहात व्यक्त केलेल्या या भावनांमुळे अजित पवारांनीही भाजपच्या सुरात सूर मिसळल्याची चर्चा सुरूय.
काय म्हणाले अजित पवार?
निलंबनाच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कधी-कधी काही प्रसंग घडतात. ते तेवढ्या पुरते घ्यायचे असतात. त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढायचा, वेळ मारून न्यायची असते. त्याबद्दलही दुमत नाही. जोपर्यंत कुणाचं काही चुकीचं असेल, तुम्ही नियम करत नाही, तोपर्यंत ते चुकायचं थांबणार नाही. माझी विनंती आहे की, कुणी जर चुकलं तर त्याला नियम करा आणि चार तास बाहेर ठेवा. त्याला त्याची चूक कळेल. चार तास कमी वाटत असेल तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा- बारा महिने कुणाला बाहेर पाठवू नका.”
अजित पवारांनी शिकवला शिष्टाचार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणातून आमदारांची खरडपट्टी काढली. ते म्हणाले, काही आमदारांनी तर नमस्कार करणंही सोडून दिलं आहे. तारतम्य राहिलेलं नाही. सगळं काही आपल्याला समजतं असं त्यांना वाटतंय. इतकी वर्षे आमदार होऊन आम्हाला समजत नाही. यांना कधी समजायला लागलं. याचा तरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. अजित पवारांच्या या वक्तव्याने अनेक जण खजिल झाल्याचे दिसून आले.