प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या वल्गना करणारी महाविकास आघाडी आणि तिचे सरकार ठाकरे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या तब्बल 39 आमदारांनी अविश्वास दाखवल्यामुळे प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागला. Uddhav Thackeray’s resignation : emotional speech
हा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी फेसबुकलाईद्वारे मोठे इमोशनल भाषण केले हे भाषण जसेच्या तसे :
शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे.
शिवसेनेला 56 वर्ष झाली. लहानपणापासून मी शिवसेना काय आहे हे नुसतं बघत नाही तर अनुभवत आलो आहे. साधी साधी माणसं कोण रिक्षावाले, कोण टपरी वाले, अगदी हातभट्टीवालेसुद्धा, त्यांना शिवसेनाप्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. नगरसेवक बनवलं, महापौर बनवलं, आमदार बनवलं, खासदार झाले मंत्री झाले, मोठी झाली माणसं.
पण मोठं झाल्यावर ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांनाच विसरायला लागले. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, ज्यांना सत्ता आल्यानंतर जे काही शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झाली.
मातोश्री आल्यानंतर साधीसाधी माणसं भेटायला येत आहेत. साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असं सांगतायात, म्हणजे ज्यांना दिलं ते नाराज आणि त्यांना काही दिलं नाही ते हिमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणूसकी, याला म्हणतात शिवसेना, याला म्हणतात शिवसैनिक.
याच नात्याच्या जोरावर शिवसेना उभी आहे. जी आव्हानं आली ती शिवसैनिकांच्या साथीने परतवत आली आहे. आता न्यायदेवतेने निकाल दिला आहे. आपण आपली बाजू मांडलेली आहे. उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांनी आपल्याला जो आदेश दिलेला आहे, तो आदेश त्याचं पालन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
राज्यपालांचे धन्यवाद मानायचे आहेत, आपण लोकशाहीचा मान राखलात. आपल्याकडे काही जणांनी पत्र दिलं. आपण तातडीने चोवीस तासाच्या आत आम्हाला फ्लोअर टेस्ट करायला सांगितली. लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे, आम्हीही करणार, ते झालंच पाहिजे, पण जवळपास दीड दोन वर्ष विधानपरिषदेच्या बारा सदस्यांची यादी जी आपल्याकडे लटकून राहिलेली आहे ती सुद्धा तातडीने मंजूर केली तर आपल्याबद्दल जो आदर आहे, तो द्विगुणित होईल.
जे दगा देणार असं सांगितलं जात ते सोबत राहिले, आजसुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण मला म्हणाले, आपला काँग्रेस-राष्ट्रवादीवर राग असेल तर आण्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, बाहेरुन पाठिंबा देतो.
आज नामांतर केल्यानंतर मी हिंदुत्व सोडंल असं तुम्हाला वाटत असेल तर यापुढे आणखी काय करु. पण आपली नाराजी सुरतला आणि गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन का नाही सांगितलं की आम्हाला बोलायचं आहे, मी बोललो असतो.
उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन
उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये.
Uddhav Thackeray’s resignation : emotional speech
महत्वाच्या बातम्या