वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे महापालिकेच्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यात मात्र, दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत असताना पुण्यात सहा वाजेपर्यंतच का केली? असा सवाल केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत राज्याप्रमाणेच पुण्यातही नियम असतील, असे म्हटले होते. पण, आता त्यांनीच शब्द फिरवल्याची टीका होत आहे. The Deputy Chief Minister turned the word on the timing of the restrictions; Dissatisfaction among Punekars
निर्णयाचा फेरविचार करा : गिरीश बापट
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या निर्बंधामध्ये राज्यात ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, पुण्यात ही मर्यादा सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे़. पुण्यातही रात्री आठपर्यंतची मर्यादा असावी़.
कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्यात एकच निर्णय लागू राहिल, असे सांगितले. परंतु पुण्याला पूर्वीचे निर्बंध लावले आहेत़ सायंकाळी सहा वाजता आस्थापना, कंपन्या बंद झाल्यावर तेथील कामगारांना घरी जाण्यासाठी तास दीड तास तरी वेळ लागतो. त्यातच पुण्यातील बससेवाही बंद आहे़. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे खासदार बापट यांनी सांगितले.
नियमावली योग्यच : पृथ्वीराज सुतार
पुण्यात कोरोनाबाधितांची वाढ अधिक आहे. त्यामुळे , पुणे महापालिकेने यापूर्वीच दुकाने सायंकाळी सहा वाजता बंद करून संचारबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे ही नियमावली योग्य आहे, असे मत शिवसेनेचे पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केले.
कोरोना साखळी तोडणे महत्वाचे : आबा बागुल
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध महत्त्वाचे आहेत. सायंकाळी सहा की रात्री आठ हा विषय महत्त्वाचा नाही. रूग्णांना बेड मिळत नाहीत. त्यामुळे सूचनांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग रोखणे जरूरी आहे, असे मत काँग्रेस पालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केले.