नाशिक : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या जबरदस्त फटका खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून स्वबळाची भाषा सुरू केली, तर शरद पवारांना ती नाईलाजास्तव सुरू करावी लागली. त्यामागे आपापल्या उरल्या सुरल्या जहागिऱ्या वाचवायची खरी स्ट्रॅटेजी असल्याचे उघड दिसले.
इसापनीतीतल्या गोष्टीतल्या राजाचा प्राण जसा पिंजऱ्यातल्या एखाद्या पोपटात असतो, तसा ठाकरे आणि पवारांच्या सत्तेचा प्राण फारच मर्यादित म्हणजे मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यातच आहे. त्यापलीकडे दोन्ही नेत्यांच्या सत्तेचा प्राण फारसा नाही. असेलच तर ती त्यांना किंवा त्यांच्या पक्षांना आलेली राजकीय सूज असते. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली उरली सुरली ताकद घेऊन स्वबळावर लढवायची भाषा उद्धव ठाकरेंनी सुरू केली. ती त्यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांना ऐकवली. शरद पवारांनी आजच्या कोल्हापूर मधल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या स्वबळावर सामंजस्याने तोडगा काढायचे आश्वासन दिले. याचा अर्थ पवारांना देखील नाईलाजास्तव स्वबळाची भाषा बोलावी लागली.
पण ही स्वबळाची लढाई ठाकरे किंवा पवारांना बाकी इतरत्र फारशी कुठे लढावीच लागणार नाही. उलट त्यांना आपले स्वबळ मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद इथे केंद्रित करता येईल. कारण उद्धव ठाकरेंना कोणत्याही स्थितीत मुंबईची महापालिका वाचवायची आहे. त्यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही महापालिकेत फारसा इंटरेस्ट राहण्याची स्थिती नाही.
मुंबई वगळता ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती आदी महापालिकांमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद उरलेली नाही. त्यामुळे तिथे स्वबळाची ताकद लावून काही फायदा होणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची या महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये कुठली ताकद असण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही. कारण शरद पवार तिथे आपली राष्ट्रवादी रुजवूच शकले नाहीत. जनतेने पवारांना पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र पुरतेच मर्यादित ठेवले.
शरद पवार किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे जिल्हा परिषद किंवा अगदी सातारा किंवा कोल्हापूर जिल्हा परिषद आणि काही प्रमाणात पुणे महापालिका यापलीकडे कुठे स्वबळाचे स्वबळाच्या बेटकुळ्याही काढता येणार नाहीत. कारण तेवढी त्यांची ताकदच नाही. पुणे, सातारा, कोल्हापूर क्षेत्रात उद्धव ठाकरेंना काही संधी नाही.
– पुणे शहर आणि जिल्ह्यात काका – पुतण्या एकत्र
फार तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीपुरती आतून संधान बांधून एकत्र निवडणुका लढवू शकतील. त्यातून थोडाफार लाभ मिळवू शकतील. किंबहुना त्यांना ते करावे लागेल. अन्यथा दोन्ही राष्ट्रवादींची पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण वाताहत होईल. त्यापलीकडे शरद पवार आणि अजित पवार यांना फारसे काही स्वबळावर करता येण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे ठाकरे + पवारांची राजकीय अस्तित्वाची लढाई ही आपापल्या उरल्या सुरल्या राजकीय जहागिऱ्या वाचवण्यासाठीच सुरू आहे आणि त्यातूनच स्वबळाची कहाणी समोर आली आहे.कारण काँग्रेस या दोघांनाही विचारण्याच्या स्थितीत उरलेली नाही आणि काहीही करून महाराष्ट्राची सत्ता खेचून घेऊ अशा बाता मारण्याचा ठाकरे + पवारांचा घास उरलेला नाही.
Thackeray and Pawar only aim to save their remaining bastions
महत्वाच्या बातम्या
- Jalgaon : जळगाव रेल्वे अपघातात ४ परदेशी नागरिकांचाही मृत्यू
- Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राची 15.70 लाख कोटींच्या करारांची भरारी, याचीच विरोधकांना पोटदुखी; फडणवीसांचा “पंच”!!
- टप्प्याटप्प्याने झाली विरोधकांची हत्यारे बोथट; स्वतःचे पक्ष वाचवण्यासाठी तरी ठाकरे + पवार आहेत का सिरीयस??
- Trumps : ट्रम्प यांच्या स्थलांतरिताबाबतच्या निर्णयांवरील अंमलबजावणी सुरूवात