• Download App
    Thackeray and Pawar ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे; तर ते मुंबई, ठाण्यात आणि पुणे, पिंपरी - चिंचवड मध्येच का अडकलेत??

    ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे; तर ते मुंबई, ठाण्यात आणि पुणे, पिंपरी – चिंचवड मध्येच का अडकलेत??

    नाशिक : महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय. Thackeray and Pawar

    मराठी माध्यमांनी महाराष्ट्रातल्या ठाकरे आणि पवार ब्रँडची टिमकी एवढी मोठ्याने वाजवली, की जणूकाही महाराष्ट्रात या दोन ब्रँड शिवाय तिसरा ब्रँडच अस्तित्वात नाही किंवा तिसरा पक्षच अस्तित्वात नाही, अशी वातावरण निर्मिती केली. परंतु, प्रत्यक्षात ती फुसकी ठरली. कारण मराठी माध्यमांनी फुगवून मोठे केलेले ठाकरे आणि पवार ब्रँड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबई आणि ठाण्यात, त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकले. बाकीच्या ठिकाणी म्हणजे तब्बल 25 महापालिकांच्या परिक्षेत्रात ते अजून पोहोचूच शकले नाहीत.

    – ठाकरे बंधूंनी आव्हान तरी दिले

    ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मुंबई आणि ठाण्यावर लक्ष केंद्रित केले, तर पवार काका पुतण्यांनी एकत्र येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष केंद्रित केले. त्यापलीकडे कुठल्या महापालिकांमध्ये निवडणुका तरी आहेत की नाही, असे वाटावे इतपत त्यांनी दुर्लक्ष केले. त्यातही ठाकरे बंधूंनी निदान खऱ्या अर्थाने सन्मानजनक युती करून भाजपला खरे आव्हान तरी दिले.

    – पण पवारांनी शरणागती पत्करली

    पण पवार काकांनी पवार पुतण्या पुढे शरणागती पत्करून आपला पक्ष फक्त औषधाला शिल्लक ठेवला. स्वतः पवार काकांनी ना नगरपालिका निवडणुकांमध्ये सहभाग घेऊन प्रचार केला ना ते महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारात उतरले. पण पवारांचे ठीक आहे कारण त्यांचे वय झाले आहे स्थानिक पातळीवरल्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचार करणे अपेक्षितच नाही. पण पवार नावाच्या ब्रँडच्या ब्रँड अँबेसिडर सुप्रिया सुळे देखील नगरपालिकांच्या आणि महापालिकांच्या निवडणूक प्रचारात उतरल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पाच-सात दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीत आघाडीवर राहून पक्षाचे नेतृत्व करणार अशी गर्जना केली होती. परंतु ती ती गर्जना प्रत्यक्षात हवेतच विरली कारण गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये सुप्रिया सुळे कुठेही प्रचारात दिसल्याच नाहीत.



    – राष्ट्रवादी नेतृत्वहीन

    त्या उलट अजित पवार फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड वर लक्ष केंद्रित करून राहिले आणि या दोन शहरांमधल्या वेगवेगळ्या ठिकाणीच त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आणि निवडणुकांचे नियोजन करण्यात धन्यता मानली. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे “कारभारी” बदला एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते महापालिका निवडणुकीत उतरले. उरलेल्या महापालिकांच्या परीक्षेत्रांमध्ये त्यांनी ती निवडणूक घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांच्या अंगावर ढकलली त्यामुळे नाशिक सारख्या शहरात पक्ष नेतृत्वहीन व्हायच्या पातळीवर येऊन ठेपला. कारण नाशिकमध्ये छगन भुजबळ प्रकृती बरी नसल्याने प्रचारात उतरू शकले नाहीत. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांचाही निवडणुकीत रस उरला नाही. अजित पवार अद्याप तरी नाशिककडे फिरकले नाहीत त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वहीन झाली.

    – संयुक्त सभांचे फक्त नियोजन

    ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्यात युती करून तिथल्या निवडणूक नियोजनात भाग घेतला, पण अजून त्यांनी रस्त्यावर उतरून प्रचार सुरू केला नाही. त्यांनी फक्त मुंबई आणि ठाणे पट्ट्यात त्याचबरोबर नाशिक मध्ये संयुक्त सभा घेण्याचे नियोजन केले. मात्र अद्याप तरी त्या योजनेची अंमलबजावणी केल्याचे दिसले नाही. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा प्रतिकात्मक पातळीवर शिवसेना भवनात उमेदवारांचा मेळावा घेतला पण त्यापलीकडे जाऊन ते सगळ्या महाराष्ट्रात फिरले, असे काही दिसले नाही.

    – फडणवीसांचा महाराष्ट्रभर संचार

    त्या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर पासून सुरू करून विदर्भातल्या सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये जाहीर सभा घेतल्या. मराठवाड्यामध्ये पक्षाचे मेळावे घेतले. त्याचबरोबर ते पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई ठाण्यात देखील प्रचारात उतरले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची भाषा विकासाची ठेवली पण जिथे महायुती त्यास नेत्यांनी त्यांना आव्हान दिले तिथे त्यांनी सौम्य शब्दांत इशारे देऊन महायुतीतल्या नेत्यांना गप्प केले. अजित पवार हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा “कारभारी” बदला, हे सांगताना अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावर चंद्रकांतदादा पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर दिले, पण आपण फार मागे जात राहिलो, तर बरेच काही निघू शकेल, असा सूचक इशारा देऊन फडणवीसांनी अजित पवारांना गप्प केले.

    या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार ब्रँड कितीही मोठे असले, किंबहुना त्या फुग्यांमध्ये माध्यमांनी कितीही मोठी हवा भरली असली, तरी प्रत्यक्षात या दोन्ही ब्रँड्सचे वारस त्यांच्या त्यांच्या गल्ल्यांमध्येच अडकले. संपूर्ण महाराष्ट्रभर ते खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण करूच शकले नाहीत.

    Thackeray and Pawar brands are stuck in their own territory

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अकोट, अंबरनाथ मध्ये सत्तेचे समीकरण जुळले; भाजपचे AIMIM आणि काँग्रेस विरोधातले सोवळे सुद्धा नाही सुटले!!

    मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!

    रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाचा दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती, मतदार यादी मध्ये नातेवाईक घुसविणे भोवले!!