विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunil Prabhu आशियातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे. अशा स्थितीत महापालिकेतील बदली आणि बढती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.Sunil Prabhu
1888 मध्ये ब्रिटिश काळात स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका ही आज आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वाहतूक यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासकीय अनिश्चितता आणि अधिकारांचा केंद्रीकरण वाढल्याचे निरीक्षण अनेक तज्ज्ञांनी नोंदवले आहे.Sunil Prabhu
बदली-बढती घोटाळ्याचा आरोप
महापालिकेत बदल्या आणि पदोन्नतीसाठी लाखोंच्या बोली लावल्या जातात, अशी धक्कादायक माहिती माध्यमांमधून वेळोवेळी समोर आली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या 122 तसेच 34 अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचे लक्षात आल्याने, मुख्यमंत्र्यांनी या बदली आदेशांना स्थगिती देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे 156 अभियंत्यांच्या बदली प्रक्रिया थांबली असून, यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर मोठी नामुष्की आली आहे.
आमदार सुनील प्रभूंची मागणी नेमकी काय
आमदार प्रभू यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, आज महापालिकेत प्रमुख अभियंता 5, उपप्रमुख अभियंता 24, कार्यकारी अभियंता 150, सहाय्यक अभियंता 200, आणि दुय्यम अभियंता 300 पदे रिक्त आहेत. पदोन्नती आणि भरती प्रक्रिया थांबली असून पात्र अधिकारी वंचित राहत आहेत. परिणामी, जास्तीचे चार्ज देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर ताण वाढला आहे आणि विकास कामांची गुणवत्ता घटली आहे. त्यांनी या गैरव्यवहारात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला असून, SIT चौकशीसोबतच आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपासाचीही मागणी केली आहे.
नगर अभियंता विभागाचा छुपा अजेंडा?
प्रभू यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनातही या विषयावर आवाज उठवला होता. त्यांनी विचारले होते की, नगर अभियंता विभागामागे काही महापालिका विरोधी छुपा मनसुबा आहे का? मर्जीतील अधिकाऱ्यांना जास्तीचे चार्ज आणि कार्यभार का दिला जातो? त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून, शारीरिक व मानसिक तणाव वाढल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. आमदार प्रभू यांनी पुढे नमूद केले आहे की, चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या धर्तीवर नगर अभियंता व संचालक हे महापालिका आयुक्तांच्या अखत्यारीत आणावेत. यामुळे चौकशी प्रक्रिया पारदर्शक होईल आणि राजकीय हस्तक्षेप टाळता येईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
SIT आणि EOW तपास अनिवार्य
या प्रकरणातील घोटाळा केवळ प्रशासकीय अनियमितता नसून आर्थिक गैरव्यवहाराचे स्वरूपही असू शकते, असा आरोप आमदार प्रभू यांनी केला आहे. त्यामुळे SIT व्यतिरिक्त, EOW च्या माध्यमातून आर्थिक प्रवाहाचा मागोवा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेली संस्था आहे. तिच्यातील पारदर्शकतेचा अभाव आणि बदली-बढती प्रक्रियेतला भ्रष्टाचार यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर या प्रकरणाला गांभीर्याने हाताळून SIT चौकशीची तत्काळ घोषणा होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Sunil Prabhu Demands SIT EOW Probe BMC Transfer Promotion Irregularities Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Trump : झेलेन्स्कींना ट्रम्प म्हणाले- रशिया युक्रेनचा नाश करेल, पुतिन यांच्या अटी मान्य करा आणि युद्ध संपवा
- Chitapur Karnataka : कर्नाटकच्या चित्तपूरमध्ये RSSच्या संचलनाला परवानगी नाकारली; भीम आर्मीलाही परवानगी दिली नाही
- Bachchu Kadu : आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका, बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – मरण्यापेक्षा लढणे सुरू करा
- सत्तेच्या वळचणीला राहूनही काका – पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझड!!