नाशिक : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली. Sunetra Pawar
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच आज दिल्लीत आल्या. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या दोन्ही भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार आणि जय पवार हे उपस्थित होते. या भेटीगाठींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचे तपशील दोन्ही बाजूंनी उघडपणे सांगितले नाहीत फक्त माध्यमांनी विलीनीकरणावर चर्चा झाल्याचा दावा केला.
– रोहित पवारांची पत्रकार परिषद
एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीतल्या सर्वोच्च सत्ता वर्तुळात अशा भेटीगाठी सुरू असताना दुसरीकडे रोहित पवारांनी दिल्लीतच पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाता विषयी दाट संशयाचे वातावरण निर्माण केले. त्यांनी कालच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन एका प्रेझेंटेशन द्वारे अजित पवारांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त केला होता. त्याच प्रेझेंटेशनचे रिपीटेशन त्यांनी आज दिल्लीत केले. पण दिल्लीतल्या प्रेझेंटेशनचे टाइमिंग मात्र त्यांनी सुनेत्रा पवारांच्या दिल्ली सत्ता वर्तुळातल्या भेटीगाठींचे निवडले. त्यामुळे पवार कुटुंबाची “डबल गेम” राजधानीतून समोर आली.
– सत्ता उपभोगायची आणि काड्या सुद्धा घालायच्या
एकीकडे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून सगळी सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे त्याच सत्तेच्या विरोधात कुठल्या ना कुठल्या काड्या घालत राहायच्या हाच तो “डाव” रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमुळे उघड्यावर आला. रोहित पवारांनी प्रेझेंटेशन मध्ये अजित पवारांच्या अपघाताविषयी दाट संशय निर्माण केला त्यात त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले, पण भाजपच्या कुठल्याच नेत्याचे नाव घेतले नाही. त्यामुळे रोहित पवारांच्या राजकीय हेतूविषयी दाट संशय निर्माण झाला. अजित पवारांच्या अपघाती अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या गोटातून अचानक दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय समोर आणला गेला. राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करायचे??, या सवालाचे उत्तर मिळण्यापूर्वीच विलीनीकरणाचा विषय प्राधान्याचा करून शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात खोडा घालायचा “डाव” खेळला, पण तसा खोडा घालण्यात ते यशस्वी ठरले नाहीत.
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी त्या पदाची सूत्रे सुद्धा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय थोडा बाजूला सरला गेला किंवा गुंडाळला गेला. त्यानंतर मात्र रोहित पवारांनी आता 13 दिवस झालेत. आता मी बोलणार, असा आव आणून मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेतल्या. पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार त्या विषयावर काही बोलले नाहीत. पण सुनेत्रा पवार दिल्लीत असतानाच रोहित पवारांनी तिथेच जाऊन पत्रकार परिषद घेतल्याने त्यांच्या राजकीय हेतूंविषयीचा संशय बळावला आणि त्याचवेळी पवार कुटुंबाची “डबल गेम” सुद्धा दिल्लीतून समोर आली.