विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीत नागरिकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेचा आणि प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करून वंचित बहजन आघाडीने आंदोलन केले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा आगडोंब, फी वाढीचे संकट, कर्जाच्या हप्त्याचा तगादा, अर्धा पगार किंवा धंदाच बंद अशा अवस्थेतही नागरिकांचे विविध पद्धतीने आर्थिक शोषण करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेचा निषेध नोंदविण्यासाठी ठाणे शहर युनिटद्वारे ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे आंदोलन केले. जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी शोषण कर्त्यांच्या विरोधात बहुजन वंचित लढा देणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. Stop Economic exploitation in Corona Crises; Demand by vanchit bahujan aaghadi
भारतीय संविधानानुसार कल्याणकारी राज्यासाठी शासनाने नेहमी तत्परतेने कर्तव्य बजावले. परंतु भ्रष्ट व्यवस्थेत संविधान विरोधी संकल्पना राबविण्याचे लोकशाहीला काळीमा फासण्याचे कार्य होत आहे. एकीकडे योग्य शासन धोरण ठरवण्याचे दुसरीकडे त्याची अंमबजावणीकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे जनतेचे शोषण होऊन यात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.आज जनता अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणापासून वंचित होत आहे. शासन सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी महागाई वाढवून नागरिकांना धक्काच देत आहे. सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकार यांनी जीवनावशयक वस्तू म्हणजेच अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल, गॅस, सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती यावर निर्बंध आणावेत. त्वरित जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती ५० टक्के कमी कराव्यात. शैक्षणिक फीबाबत दर निश्चित करावेत. अशा प्रकारच्या मागण्या केल्या.
वंचित बहुजन आघाडी, ठाणे शहर युनिटतर्फे जिल्हा महासचिव जयवंत बैले, महासचिव अँड. किशोर दिवेकर, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत शिंदे, महिला अध्यक्ष सूनिता रणपिसे, सचिव विनोद साबळे, अमर आठवले, बाबासाहेब येडेकर उपस्थित होते.
- भ्रष्ट व्यवस्थेमुळे जनता हैराण
- महागाई वाढवल्याने नागरिकांना फटका
- संविधान विरोधी संकल्पना राबविली
- लोकशाहीला काळीमा फासण्याचे कार्य
- जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ५० टक्के कमी करा
- शैक्षणिक फीबाबत दर निश्चित करा
- पेंट्रोल, डिझेलच्या किमतीवर नियंत्रण आणा