विशेष प्रतिनिधी
मुंबई : ST employees strike : यंदाच्या दिवाळीच्या सणासमयी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संघटनेचे नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (अध्यक्ष) आणि आमदार सदाभाऊ खोत (कार्याध्यक्ष) यांनी सरकारला मागण्या मान्य न केल्यास आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील MSRTC मुख्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन आणि धरणे आंदोलन केले जाईल, असे संघटनेने जाहीर केले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
वा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने खालील मागण्या शासनाकडे ठेवल्या आहेत:
- 2006 पासून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करावे.
- 2016 पासून थकीत घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि इतर भत्ते द्यावेत.
- सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.
- प्रत्येक कर्मचाऱ्यास 20,000 रुपये दिवाळी बोनस द्यावे.
- आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 8.5 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
- संपकाळात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
- रिक्त पदांवर त्वरित नवीन भरती करावी.
- खासगी बसऐवजी महामंडळाच्या स्वतःच्या बसचाच वापर करावा.
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 43% महागाई भत्ता द्यावा.
- 2015 पासूनच्या प्रवास भाडेवाढीची थकबाकी पूर्वलक्ष्यी प्रभावाने द्यावी.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी आर्थिक लाभ द्यावा.
या मागण्यांवर शासनाने त्वरित तोडगा काढावा, अन्यथा कर्मचारी आक्रमक पवित्रा घेतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
स्थावर मालमत्तेचा मुद्दा
महामंडळाच्या स्थावर मालमत्तेचा (MSRTC Properties) वापर उद्योगधंद्याच्या धर्तीवर करावा किंवा ती शासनात विलीन करावी, अशी मागणीही संघटनेने लावून धरली आहे. यामुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.
आंदोलनाची तयारी
28 सप्टेंबरपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील MSRTC मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी धरणे आंदोलन करतील. शासनाने या मागण्यांवर वेळेत निर्णय न घेतल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यास प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे शासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चेतून लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.
ST employees warn of strike ahead of Diwali; Will passengers face problems?
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!