प्रतिनिधी
मुंबई : भाजपबरोबर शिवसेना 25 वर्षे युतीत सडली असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीत कुचंबल्या सारखीच झाली आहे. शिवसेनेला काँग्रेससाठी कोल्हापूर उत्तर मतदार संघ सोडावा लागला आहे. आता त्यापुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस साठी विशेषतः पार्थ पवारांसाठी सोडण्याचा शिवसेना नेतृत्वावर दबाव आणला आहे.
Shivsena In Trouble: Shivsena left Kolhapur North for Congress
कोल्हापूर उत्तर मध्ये राजेश क्षीरसागर यांच्या सारखा तगडा उमेदवार असताना त्यांची “समजूत” काढून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या उमेदवारासाठी सोडणे शिवसैनिकांना भाग पाडले आहे. पण आता मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना हा मतदारसंघ पार्थ पवारांसाठी सोडून श्रीरंग बारणे यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पुढे आली आहे.
एकीकडे काँग्रेससाठी असा राजकीय “त्याग” कोल्हापूरमध्ये केल्यानंतर मावळमध्ये राष्ट्रवादीसाठीही शिवसेनेने “त्याग” करावा असा प्रस्ताव शिवसेना नेतृत्वा पुढे देण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा प्रस्ताव स्वीकारणार का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांध्ये शिवसेनेने मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली. यासाठी त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली. या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ उडाली
राज्यात काही वेळा मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचेही नेते मंडळी निवडणुकीची तयारी करा, असे सांगत आहेत, तर शिवसेनेही राज्यभर शिवसंपर्क मोहिमेच्या अंतर्गत संपर्क सुरू केले आहेत. त्यामुळे आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या एका फेसबूक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. आगामी निवडणुकांमुळे आताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खरेतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळीच मागणी केली आहे.
नितीन देशमुखांनी काय म्हटले?
नितीन देशमुख यांनी लिहिले की, ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहत आहे, त्याप्रमाणे पार्थ यांनाही एक फेअर चान्स मिळाला पाहिजे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन श्रीरंग बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे.
Shivsena In Trouble: Shivsena left Kolhapur North for Congress