प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश करून आज शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार केला पण या विस्तारात कोणाला झुकते माप मिळाले कोणाला मंत्रीपदाची संधी मिळाली? यापेक्षा कोणाला मंत्रीपदे मिळाली नाहीत? याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे अथवा किंबहुना माध्यमांनी रंगवली आहे. Shinde Fadanavis cabinet expansion, 18 ministers took oath, but media harps on who got no chance?
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या समावेशानंतर माध्यमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टार्गेट केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकाही महिलेला स्थान दिले नसल्याबद्दल शरसंधान साधले आहे, तर संजय राठोड यांच्या समावेशाने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या संतप्त झाल्या आहेत. पहिल्या विस्तारात स्थान न दिल्याबद्दल बच्चू कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिला आहे अर्थात या सगळ्या मराठी माध्यमांच्या बातम्या आहेत. एकनाथ शिंदे गटातील अनेकांची नावे आयत्यावेळी गळाल्याची चर्चा आहे त्याचबरोबर भाजपने “गुजरात पॅटर्न” न राबवता जुन्याच मंत्र्यांना संधी देण्याचे सावधगिरी दाखवल्याचीही चर्चा आहे.
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती तो विस्तार आज झाला असून शिंदे गटातील 9 आणि भाजपमधील 9 अशा एकूण 18 जणांनी शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी कसरत करावी लागली आहे. दुसरीकडे, अनेक दिग्गज नेते स्पर्धेत असताना मोजक्या नेत्यांनाच पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची संधी देताना भाजप नेतृत्वाचीही मोठी कसोटी लागली होती.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मुंबई आणि कोकण पट्ट्यातून चार नेत्यांना मंत्रिपदे मिळाली आहे, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातूनही चार नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेत विदर्भ मात्र काहीसा मागे राहिल्याचं पाहायला मिळाले असून विदर्भातील केवळ दोन नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मंत्रिमंडळात विदर्भातील वजनदार नेते असले तरी आज झालेल्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात मात्र इतर विभागांच्या तुलनेत विदर्भातील कमी नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढील टप्प्यात ही कसर भरून काढली जाईल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या विभागातून कोण मंत्री?
मुंबई – कोकण : स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण
मराठवाडा : अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अतुल सावे, तानाजी सावंत
उत्तर महाराष्ट्र : गुलाबराव पाटील, दादा भुसे,
गिरीश महाजन, विजयकुमार गावित
पश्चिम महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे
विदर्भ : स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय राठोड, सुधीर मुनगंटीवार.
यामध्ये माध्यमांनी चालवलेली आशिष शेलार, देवयानी फरांदे, झाडी हॉटेल ओके फेम शहाजी बापू पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली नसल्याची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे.