• Download App
    Sharad Pawar साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    साहेब खडे, तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!, अशाच शब्दांनी शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल. शरद पवारांनी नाशिक मध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर घेतले. त्यामध्ये साहेब खडे, तो सरकार से बडे!!, अशी प्रतिमा निर्मिती करण्यात आली. त्या प्रतिमा निर्मितीवर जयंत पाटलांनी सुद्धा आज शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार पेक्षा साहेबांचा आधार मोठा वाटतो, असा दावा जयंत पाटलांनी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्यक्रमात जाहीरपणे केला. Sharad Pawar

    पण पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मधल्या शिबिरातली प्रतिमा निर्मिती आणि जयंत पाटील यांचा दावा हे एकमेकांशी जुळत असले तरी मुळात साहेब खडे, तो सरकार से बडे!!, हा दावा किंवा प्रतिमा निर्मिती खुद्द शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाशी मात्र मिळती जुळती ठरत नाही. कारण शरद पवार उभे राहिले किंवा बसले, तरी त्यांनी मनाशी बाळगलेली राजकीय स्वप्ने खऱ्या अर्थाने कधीच पूर्ण‌ झाली नाहीत, हे टोचणारे वास्तव समोर आले.

    – पंतप्रधान पदाचे स्वप्न हवेत विरले

    शरद पवारांना फार पूर्वी पंतप्रधान व्हायचे होते, पण गेल्या 34 वर्षांमध्ये ते स्वप्न जसेच्या तसे कायम आहे. किंबहुना ते टप्प्याटप्प्याने हवेत विरून गेले आहे. शरद पवारांना महाराष्ट्रात किंबहुना देशातच काँग्रेसला प्रचंड मोठा पर्याय उभा करायचा होता, पण गेल्या 26 वर्षांमध्ये हे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले नाही. त्या उलट ज्या काँग्रेसच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पक्षाच्याच सत्तेच्या वळचणीला जाऊन आयुष्यभराची राजकीय वाटचाल करावी लागली. नंतर ती राष्ट्रवादी फुटलेली पवारांना पहावी लागली आणि पुतण्या भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेल्याचे किंवा पाठविण्याचे “राजकीय पुण्य” पदरात घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी “राजकीय गुळपीठ” जमवावे लागले.

    – मुलीचे मुख्यमंत्री पद कुठेय??, माहिती नाही

    पण एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये पवारांना स्वतःच्या स्वप्नांबरोबर मुलीचे स्वप्नही पूर्ण करता आले नाही. महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना प्रस्थापित करणे सोडाच, त्यांचे नावही नीटपणे पुढे आणता आले नाही. स्वतः निवृत्त होऊन आपल्या अखंड पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हाती देण्याचे स्वप्न जेव्हा पवारांनी पाहिले, नेमका त्याचवेळी घात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्षच त्यांच्या हातातून निसटून गेला. किंबहुना तो पुतण्याने काढून घेतला. त्यामुळे आपला अखंड राजकीय वारसा सुद्धा पवारांना अद्याप आपल्या स्वतःच्या मनानुसार आणि मतानुसार मुलीकडे सोपविता आलेला नाही.



    – मराठा राजकारण निसटले, ओबीसी राजकारण धरले

    महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी पवारांनी जंग जंग पछाडले. 2014 पासून 2025 पर्यंत उलट्यापालट्या अनेक खेळल्या केल्या. उद्धव ठाकरेंना नादी लावले. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्री केले. पण त्या मुलीला मुख्यमंत्री करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी मराठा आंदोलनासारखा विस्तवाशी खेळ केला. तो विस्तव विझून गेल्यानंतर आपण त्यातले नाहीच, आपला त्याच्याशी संबंध नाहीच, असे सांगून त्यांनी हात झटकून घेतले. मनोज जरांगे यांची किंमत कवडीची ठरवली. मराठा आंदोलनाचा कुठलाच अनुकूल अनुभव आला नाही. राजकीय फायदाही मिळवता आला नाही हे लक्षात आल्याबरोबर पवारांनी ओबीसी राजकारणात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या पक्षाला पिवळा रंग देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात मंडल प्रयोग नव्या बाटली जुनीच दारू या पद्धतीने करायचा डाव खेळला. पण तोही अजून पूर्ण झाला नाही.

    – “नेपाळची” भीती गोविंद बागेलाच

    महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करून महाराष्ट्रात “नेपाळ” करायचा इशारा देऊन झाला. पण महाराष्ट्राचा “नेपाळ” झाला, तर आपले “सिल्वर ओक” आणि “गोविंद बाग” हे देखील वाचणार नाहीत. महाराष्ट्राच्या नेपाळमध्ये आपणच संस्कारित केलेल्या नेत्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील हे लक्षात आल्याबरोबर पवारांना यू टर्न घेणे भाग पडले. देशात तर सोडाच, पण महाराष्ट्रातही आपण सरकारला 2029 पर्यंत ओरखडाही काढू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर पवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नवी प्रतिमा निर्मिती सुरू केली. त्यातूनच साहेब खडे तो सरकार से बडे!!, ही घोषणा अस्तित्वात आली. महाराष्ट्रातले सरकार आपण हलवू शकत नाही. आपले सरकार आणू शकत नाही, तर निदान त्या सरकार पेक्षा तरी आपण मोठे आहोत हे दाखवायला काय हरकत आहे??, या विचारातून साहेब खडे तो सरकार से बडे!! ही घोषणा दिली गेली. पण साहेब खडे तो सरकार से बडे, पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!, हेच वास्तव पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या हाती उरले.

    Sharad Pawar’s image building is larger than life, but his accomplishments are minimal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !

    महाराष्ट्र शासन आणि नाम फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार; ग्राम प्रणालीतून ग्रामीण भागाचा विकास साधणार!!