नाशिक : शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये. यात राजकारण आणाल तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले. मात्र त्यावरून फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली, असा खोचक टोला शरद पवार यांनी हाणला. असा टोला आणून शक्तीपीठ मार्गाच्या आड “नेमकं कोण” येतंय हे त्यांनी सूचक पद्धतीने स्वतःकडेच बोट दाखवून सांगितले. पवार नेहमीच फडणवीसांना कमी लेखण्यासाठी असं बोलतंच असतात. पण शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातले, तर पवार काय करतील??, असा सवाल त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे त्याचे शाब्दिक उत्तर ते देत नाहीत. Shaktipeeth Expressway
पवारांनी आत्तापर्यंत फडणवीसांच्या काही स्कीम मध्ये अडथळे आणायचा जरूर प्रयत्न केला, पण ज्यावेळी मोदींनी लक्ष घातले किंवा ज्या विषयांमध्ये मोदींनी लक्ष घातले, तिथे मात्र पवारांना माघार घ्यावी लागली. हा इतिहास फार जुना नसून 2014 पासूनचा आहे.
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र, कोल्हापूर, धाराशिव आणि सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला होता. विधानसभा निवडणुकीत महायुतीने या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या कामास पुन्हा गती दिली. 24 जून रोजी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या दृष्टीने 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी दिली.
या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले. काँग्रेससह विरोधकांनी या प्रकल्पावर जोरदार टीका केली, तर शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यात राजकारण आणाल तर याद राखा, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला हाणला.
शरद पवार म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली, तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी हाणला. फडणवीसांच्या याद राखा, या इशाऱ्यावर शरद पवारांनी आता आमच कसं व्हायचं?, असा खोचक टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही
शरद पवार पुढे म्हणाले की, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. त्या भागातला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलतायेत त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
– पवारांचा पोपट उडेल
पवारांनी आत्तापर्यंत राज्यातल्या महायुतीच्या कामांमध्ये अनेक अडथळे आणले कारण सगळे चांगले प्रकल्प महायुतीच्या नावावर झाले. त्यात आपले काही कर्तृत्व नाही हे त्यांनी बरोबर जाणले. पण ज्या प्रकल्पांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातले तिथे मात्र पवारांना माघार घ्यावी लागली. बुलेट ट्रेन, पुणे मेट्रो, मुळा मुठा रिव्हर फ्रंट ही त्याची उदाहरणे ठरली. त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी ज्यावेळी गौतम अदानी मुद्द्यावर नरेंद्र मोदींना अडचणीत आणायचा प्रयत्न केला किंवा धारावीच्या पुनर्विकास संदर्भात अदानी प्रकल्पांवर प्रश्नचिन्हांचा ठपका लावला, त्यावेळी पवार मोदींच्या बाजूने स्पष्टीकरण द्यायला पुढे आले. त्यांनी अदानी आणि मोदींचे समर्थन केले. जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटवण्याच्या चर्चेत त्यांनी भाग घेतला नाही. महिला आरक्षण मुद्द्यावर संसदेत विरोध केला नाही. Waqf सुधारणा कायद्याला संसदेत विरोध केला नाही. ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावर ठळक प्रश्नचिन्हे लावली नाहीत. मोदींना तोंडी विरोध आणि प्रत्यक्षात (अप्रत्यक्ष) पाठिंबा असली “डबल ढोलकी” पवारांनी नेहमीच वाजवली. त्यामुळे फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली, असे पवार म्हणाले असले, तरी मोदींनी शक्तिपीठ मार्गात लक्ष घातल्याबरोबर पवारांच्या विरोधाचा पोपट उडून गेलेला असेल.
sharad pawar on devendra fadnavis statement on shaktipeeth expressway says
महत्वाच्या बातम्या
- नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण
- World War III : तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याची घंटा वाजली! आता चीन अन् रशिया कोणते मोठे पाऊल उचलणार?
- IndiGo flight : ‘मेडे’ कॉलनंतर चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
- RCB wins : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतून BCCIने घेतला धडा!