माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून स्वतःचाच चेअरमन पदाची बेगमी करून ठेवली पण त्याचवेळी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चेची फुसकुली पुन्हा हवेत सोडली गेली. अमोल मिटकरी, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील हे सगळे नेते अजितदादांचे मुख्यमंत्री पदाविषयी बोलले, पण त्याच वेळी “पवार संस्कारित” पण सध्या भाजपचे नेते असलेले चंद्रराव तावरे यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाचा फुगा एका झटक्यात फोडला. Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांना एकीकडे मुख्यमंत्री व्हायचंय, दुसरीकडे माळेगाव कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. आता ते काटेवाडीचे पोलीस पाटील सुद्धा होतील, असा टोला चंद्रराव तावरे यांनी हाणला. एकाच घरात तीन खासदार, दोन आमदार, एक उपमुख्यमंत्री सगळी पदे पवारांच्याच घरात. मग कार्यकर्त्यांनी करायचे काय??, असा बोचरा सवाल चंद्रराव तावरे यांनी केला. जयंत पाटलांनी अजितदादांची फिरकी घेतली. आमच्या पक्षाकडे दहाच आमदार आहेत. अजितदादांना त्यांच्या बळावर कसं मुख्यमंत्री करणार?, असा खोचक सवाल जयंत पाटलांनी केला.
अजितदादांचे मुख्यमंत्रीपद आणि शरद पवारांचे पंतप्रधानपद हा महाराष्ट्र टिंगल टवाळीचा विषय झाला. याला कारणीभूत त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि तोकडे राजकीय कर्तृत्व हेच ठरले. दोघेही नेते जाहीरपणे महत्त्वाकांक्षांविषयी बोलून बसले. त्यामुळे आपोआपच त्यांच्या तुलना त्या पदाशी झाल्या. पण राजकीय कर्तृत्वाच्या अभावी आपण तिथे पोहोचू शकत नाही आणि आपले तेवढे समर्थक कधीच निवडून आणू शकत नाही हे मात्र काका – पुतण्यांनी लक्षात घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनीही ते नजरेआड केले.
मग कधी पांडुरंगाला साकडे घाल, कधी दुसऱ्या देवाला साकडे घाल, कधी कुठल्या चमत्काराची अपेक्षा धर, तर कधी राजकारणात मोडून तोडून मुख्यमंत्री पदाच्या किंवा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसण्याच्या बाता मार असला प्रकार पवारांच्या राष्ट्रवादीत नेहमीच सुरू झाला. सुनेत्रा पवारांनी पांडुरंगाला साखळी घातले. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी देखील पांडुरंगालाच साकडे घातले. अगदी त्याला प्रफुल पटेल सारखे ज्येष्ठ नेते देखील अपवाद ठरले नाहीत. शरद पवार साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचे असे ते 2019 मध्ये म्हणाले होते त्यावेळी पवारांचे फक्त चार खासदार लोकसभेत पोहोचले होते.
काँग्रेस सारख्या पक्षांमध्ये आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही हे पाहून पवारांनी काँग्रेस फोडली त्या काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बळावर स्वतःचे राष्ट्रवादी पोसली. पण आपल्या पक्षाची संघटना सगळ्या देशात वाढवायची असते. त्यासाठी पुणे, सातारा, सोलापूर या पलीकडे जाऊन मोठे दौरे करायचे असतात हेच पवार विसरले. आणि कधी मधी त्यांनी देशात इतरत्र दौरे केले, तरी त्यांना तेवढा प्रतिसाद कधी मिळालाच नाही. कारण तेवढे मोठे राजकीय कर्तृत्व पवारांनी कधी सिद्धच केले नाही.
– काका – पुतणे कर्तृत्वात तोकडे
जे थोरल्या पवारांचे केंद्रात झाले, तेच अजितदादांचे राज्यात झाले. वयाच्या 65 देखील अजित पवारांना स्वतःचे राज्यव्यापी नेतृत्व प्रस्थापित करता आले नाही. ते कायम काकांच्या छायेत राहिले आणि कायमचे उपमुख्यमंत्री झाले. काकांपासून बाजूला झाले. भाजपने त्यांना सत्तेच्या वळचणीला घेतले. पण उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जखडून ठेवले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर झेप घ्यायची असेल, तर आधी उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून उठावे लागले. काकांच्या छायेतून कायमचे बाहेर पडावे लागेल. भाजपच्या सत्तेची वळचण सोडावी लागेल. स्वकर्तृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष सगळ्या महाराष्ट्रात रुजवावा लागेल. संघटना वाढवावी लागेल. तेव्हा कुठे लोक अजितदादांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घेऊ लागतील, हे स्वतः अजित पवारांना, त्यांच्या नातेवाईकांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजावे लागेल. अन्यथा ते कायमचे “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर चिकटून राहतील. नेते आशा लावून बसतील.
Sharad Pawar and Ajit Pawar : big ambitions, but limited capabilities
महत्वाच्या बातम्या
- Yoga Day 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५: पंतप्रधान मोदी आज विशाखापट्टणममध्ये, तर अमित शहा अहमदाबादमध्ये
- अखेर मोदींनी स्वत:च सांगितलं अमेरिकेस न जाण्यामागचं नेमकं कारण!
- Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनला जाणार ; पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीही समोर असणार
- Sheikh Hasina : सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये मिळाला शेख हसीना यांना मोठा दिलासा