विशेष प्रतिनिधी
मुंबई : विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलीय. राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. School bells in rural areas will ring from July 15
पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर राज्य सरकार आणि शिक्षण विभागाचं पूर्ण लक्ष असेल. ज्या गावात एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तसंच ज्या गावातील सरपंच, तलाठी, वैद्यकीय अधिकारी आणि शालेय शिक्षण समिती या सर्वांनी मिळून गाव कोरोनामुक्त राखण्याचा ठराव सर्वानुमते केलाय, अशा गावात 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीय. त्याचबरोबर शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तसंच पालकांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
- ग्रामीण भागातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार
- पंधरा जुलैपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय
- कोरोनामुक्त गावात शाळा सुरु करण्यास मंजुरी
- स्थानिक पातळीवर आढावा घेण्याच्या सूचना
- आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार
- टप्प्या टप्प्याने अन्य वर्ग सुरु होण्याची शक्यता
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कानोसा घेणार