प्रतिनिधी
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यातून प्रत्येक येणारी पिढी प्रेरणा घेते अशा नाशिक मधील तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिर या निवासकेंद्राचे अत्याधुनिकरण होणार आहे. कारण यासाठी अभिनव भारत केंद्राच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने 5 कोटी रूपयांच्या निधी मंजूर केला आहे. Savarkar Abinav Bharat: Provision of Rs 5 crore for Savarkar’s Abhinav Bharat Mandir in Nashik!
स्वातंत्र्य चळवळीचे होणार ‘जतन’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तिळभांडेश्वर लेनमध्ये निवासस्थान आहे. सन 1899 ते सन 1909 या दरम्यान 10 वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी वास्तव्यास होते. या ठिकाणी वास्तव्यास असताना वीर सावरकर यांनी अभिनव भारत संस्थेची स्थापना करून स्वातंत्र्य लढा तीव्र केला होता. इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य लढा कसा सुरू ठेवायचा, तो अधिकाधिक तीव्र कसा करायचा याची रणनीती याच अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयात आखली जायची. देशभरातील अनेक क्रांतीकारक याच ठिकाणी येऊन वीर सावरकरांची भेट घ्यायचे. यामुळे या निवास मंदिराला अनन्य साधारण असे ऐतिहासिक महत्व आहे. या निवासस्थानाला अभिनव भारत मंदिर असे नाव दिलेले आहे. परंतु अभिनव भारत मंदिराचा वाडा हा मोडकळीस आलेला असल्याने त्यांतील वस्तू, विविध छायाचित्रे तसेच वीर सावरकर यांनी वापरलेल्या वस्तू यांचे जतन करणे अवघड होत होते. आता राज्य सरकारने या ठिकाणाच्या विकासासाठी ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे.
ग्रंथालय आणि प्रदर्शन
या निधीतून अभिनव भारत मंदिरामध्ये स्वातंत्र्य चळवळी विषयीचे ठळक मुद्दे, अद्ययावत आणि परिपूर्ण ग्रंथालय, वीर सावरकर यांचा आधुनिक विचार आणि विज्ञानदृष्टी याविषयीचे विशेष संग्रहालय, सन १८५७ ते १९४७ या दरम्यानच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे फोटो, तसेच त्यांच्या विषयीच्या डिजीटल माहितीचे दालन, वीर सावरकर यांचे डिजीटल स्वरूपाचे समग्र साहित्य हॉल, मराठी शब्दकोश, स्वातंत्र्य चळवळी विषयीच्या फोटोंची गॅलरी, वीर सावरकरांचे विविध फोटो आणि पुस्तक सामुग्रीचे प्रदर्शन हॉल उभारण्यात येणार आहे.