• Download App
    निष्ठावंतांच्या जखमेवर मोदींचे “मीठ”; पण बरनॉल लावताना सामनकारांचीच जळजळ। Sanjay raut targets PM modi over cabinet reshffle

    निष्ठावंतांच्या जखमेवर मोदींचे “मीठ”; पण बरनॉल लावताना सामनकारांचीच जळजळ

    विनायक ढेरे

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना निष्ठावंत भाजपाईंच्या जखमेवर “मीठ चोळले” हे खरेच… पण त्याची जळजळ निष्ठावंतांना झोंबण्याऐवजी शिवसेनेलाच जास्त झोंबल्याचे दिसतेय. Sanjay raut targets PM modi over cabinet reshffle

    ज्या निष्ठावंत भाजपाईंचा कळवळा आणून शिवसेनेच्या सामनाकारांनी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आगपाखड केली आहे, ते पाहाता मंत्रिमंडळातून वगळल्याचे दुःख निष्ठावंत भाजपाईंना जेवढे झालेले दिसत नाही, तेवढे सामनाकारांना झालेले दिसते. किंबहुना मोदींवर आगपाखड करताना अगदी त्यांनी नक्राश्रू ढाळलेले दिसतात.

    हे नक्राश्रू ढाळताना सामनाकारांनी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे विश्लेषण करताना अनेक जावईशोध देखील लावलेले आहेत. डॉ. भागवत कराडांना मंत्रिपद देऊन पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे. प्रकाश जावडेकरांना वगळून त्यांच्या अनुभवाचा मोदींनी उपयोग करून घेतलेला नाही. मंत्रिमंडळातले बरेचसे सदस्य हे लाटेबरोबर वाहून किनाऱ्याला लागलेले ओंडके आहेत. डॉ. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले. त्यांना मंत्री केले पण प्रीतम मुंडेंना डावलले वगैरे… वगैरे… हे सामनाकारांचे जावईशोध आहेत.



    बाकी सामनाकारांना इतरांच्या सावलीत राहण्याची सवय असल्याने इतर नेते सावलीबाहेर पडून स्वतंत्रपणे राजकीय कर्तृत्व दाखवू शकतात, याची जाणीव नसावी. कारण ते आधी बाळासाहेबांच्या सावलीत वाढले. नंतर ते उध्दवरावांच्या सावलीत आले आणि आता त्यांची आदित्य सावलीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बाळासाहेब सोडून बाकीच्या सावल्यांना सावली द्यायला सिल्वर ओकच्या वडाची महासावली आहेच.

    त्यामुळे सामनाकारांचे म्हणणे अगदी बरोबर आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याप्रमाणे वागून डॉ. भागवत कराडांना मंत्री करण्याऐवजी प्रीतम मुंडे यांनाच मंत्री करायला हवे होते.

    पण सामनाकार एवढ्यावरच थांबलेले नाहीत. डॉ. भागवत कराडांना मंत्री करणे हा त्यांना मुंडेंना खतम करण्याचा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा मोदींचा डाव वाटतोय. हा तर सामनाकारांचा सगळ्यात जबरदस्त जावईशोध आहे.

    पण मग गोपीनाथ मुंडेंचे खानदान फोडून धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेणाऱ्यांनी काय मुंडेंचा राजकीय वंश वाढविला काय की त्यांच्या राजकीय वंशावर आपले असे कलम केले की त्यामुळे मुंडेंचा राजकीय वंश वाढावा… मोदींनी मुंडेना खतम करून ओबीसी समाजात फूट पाडली, असे सामनाकार म्हणतात, तर मग धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी काय ओबीसी समाज सांधला की मुंडेंचे राजकीय भवितव्य अधिक उज्जल केले…?? याचे उत्तर सामनाकार देणार नाहीत. कारण आज ते त्यांच्या सोयीचे नाही.

    निष्ठावंत भाजपाईंच्या जखमेची त्यांना काळजी अधिक आहे. म्हणून त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्या जखमांवर बरनॉल लावले आहे. पण त्यामुळे निष्ठावंतांना गार वाटण्याऐवजी सामनाकारांच्या बोटाची आणि कशाकशाची जळजळ झाल्याचे त्यातून महाराष्ट्राला दिसले आहे.

    बाकी शिवसेनेत दिवाकर रावते, रामदास कदम, अजय चौधरी, विजय शिवतारे या निष्ठावंत शिवसैनिकांची जबरदस्त राजकीय चलती असल्याचे महाराष्ट्राला चित्र दिसतेच आहे…!!

    Sanjay raut targets PM modi over cabinet reshffle

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस