विशेष प्रतिनिधी
मुंबई : INDI आघाडी लोकसभा निवडणूक जिंकली, तर देशाचा पंतप्रधान निवडायला फक्त 48 तास लावेल, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी जाहीर केले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचा चॉईस राहुल गांधी असल्याचे सांगितले. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. हा पाठिंबा देताना त्यांनी परस्पर उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान पदाच्या शर्यतीचे नाव मागे घेतले. Sanjay Raut supports rahul Gandhi for prime ministership, take back uddhav thackeray’s name
INDI आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची तुम्ही काळजी करू नका. उद्धव ठाकरे यांच्यात देखील पंतप्रधानपदाची क्षमता आहे. ते पंतप्रधान होऊ शकतील, असे संजय राऊत यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये आणि जाहीर सभांमध्ये आधी सांगितले होते. उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान पदाची “हॅट” त्यांनी आधीच रिंगमध्ये टाकून ठेवली होती. शरद पवार तर त्यांचे सगळ्यात “फेवरेट” “पंतप्रधान” होतेच, पण आता मात्र लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 दिवसांवर येऊन ठेपली असताना संजय राऊत यांनी आपली भूमिका बदलून राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले :
मी दैनिक सामनात जे लिहितो, त्याला सत्याचा आधार असतो. म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता. महायुतीत पाडापाडीचा खेळ झाला आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची लढाई भाजपसोबतच होती. आम्ही भाजपचा पराभव करत आहोत.
राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं हे सरकार आहे. त्या सरकारचा बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस पाठवतो. महाराष्ट्रात या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला. मी फोटोसोबत ट्विट केलं आहे. हेलिकॉप्टरमधून पैसे आणले. कोर्टात जा. आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा. 4 जून नंतर खूप मजा येणार आहे. आम्ही घाबरणारे लोक नाहीत. या देशात खरं बोलणाऱ्यांच्या विरोधात केस दाखल होते. किंवा एफआयआर दाखल केला जातो. किंवा तुरुंगात टाकलं जातं. आता केजरीवाल पुन्हा तुरुंगात जात आहेत.
निवडणूक आयोगाला हाताशी धरून सेलिब्रिटींच्या सोयींसाठी तारखा घेतल्या आहेत. पंतप्रधानांनी शेवटच्या टप्प्यात स्वत:चं मतदान ठेवलं. निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही, तर राजकारणातील सेलिब्रिटींची सोय बघत आहे.
राहुल गांधी देशाची चॉईस
INDI अलायन्स लोकसभा निवडणूक जिंकत आहे. 4 जून रोजी 12.00 वाजल्यानंतर तुम्हाला कळेल. INDI आघाडीचाच पंतप्रधान होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉईस असल्याचं सांगितले. मीही सांगतो, संपूर्ण देशाची चॉईस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींना स्वीकारले आहे.