विशेष प्रतिनिधी
पुणे : उत्तर भारत आणि हिमालयीन विभागामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने बाष्प येत आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. १० मार्चपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण असणार आहे. Rainy weather in the state till March 10
महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व प. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतही सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात २ दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील बहुतेक भागात आठवडाभर वातावरण ढगाळ राहिले. त्यामुळे रब्बी पिकांसह आंब्याच्या मोहरावर दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. दरम्यान, पुण्यात औंधमधे काल रात्री नऊनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला होता दुपारनंतरच्या वेळेत शहरात काही ठिकाणी पावसाचे हलके थेंब पडत होते.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत ९ मार्चला सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.