विशेष प्रतिनिधी
नाशिक : शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह निसटल्यानंतर महाराष्ट्रभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी शरद पवारांवर शरसंधान साधले. पण पवारांच्या राजकारणाचे बळी गेलेल्या महाजन मुंडे कुटुंबाचे प्रतिनिधी आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शरद पवारांवर तिखट शब्दांमध्ये हल्लाबोल केला. prakash mahajan mns leader to sharad pawar
आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी इतरांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शरद पवारांच्या काळजात काल निवडणूक आयोगाच्या निकालाच्या निमित्ताने अजित पवारांनी कट्यार घुसवली, अशा शब्दांमध्ये प्रकाश महाजनांनी शरद पवारांचे वाभाडे काढले.
शरद पवारांनी आयुष्यभर स्वार्थी राजकारण करताना इतरांचे पक्ष फोडले. इतरांची घरे फोडली. खुद्द आमचेच कुटुंब पवारांच्या राजकारणाचे बळी आहे. गोपीनाथरावांचे घर फोडताना शरद पवारांच्या हे लक्षात आले नाही, की कधी ना कधी तरी ही वेळ आपल्याही घरावरही येऊ शकते. पण पवारांनी आयुष्यभर जे फोडाफोडीचे राजकारण केले, महाराष्ट्रात जातीद्वेषाचे विष कालवले, जाती – जातींमध्ये, समाजा – समाजांमध्ये भांडणे लावली, आज त्याचीच फळे पवारांना उतारवयात भोगावी लागत आहेत. त्यांनीच पेरलेले आज उगवले आणि ते पीक पवारांना कापावे लागत आहे, अशी घणाघाती टीका प्रकाश महाजन यांनी केली.
पवारांनी आधी जे केलं तेच त्यांना उतार वयात फेडावं लागते आहे. आता पवार सहानुभूतीचे कार्ड खेळतील, पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी काडीमात्र सहानुभूती उरलेली नाही, असे प्रकाश महाजन म्हणाले.