विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणत्याही स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपचा पराभव करावा यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आज आघाडीच्या नेत्यांवर एक “लेटर बॉम्ब” टाकला आणि त्यात आपण बाराच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे दाखवून दिले. Prakash Ambedkar insisted on the formula of twelve
महाविकास आघाडीत तीन घटक पक्ष असताना वंचित बहुजन आघाडीला चौथा घटक पक्ष म्हणून सामावून घ्यावे यासाठी प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या मागे लागले आहेत. त्यांची वंचित बहुजन आघाडी दररोज या नेत्यांना जागा वाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले देत आहे. त्यातलाच एक फॉर्म्युला आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा आहे. ही “राजकीय समानता” आणून आपण मोदींचा पराभव करू शकतो, असा प्रकाश आंबेडकर यांचा दावा आहे. या दाव्यावर ठाम राहत प्रकाश आंबेडकरांनी आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आज एक पत्र पाठविले असून त्या पत्रामध्ये सर्व घटक पक्षांनी मिळून प्रत्येकी 12 जागा लढवून महाराष्ट्रात मोदींचा पराभव करावा, असे आवाहन केले आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा “इंडिया” आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.
I.N.D.I.A. आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी ठेवली मोठी अट!
प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला
पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी 48 जागांचे महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य आणि “संघर्षमुक्त” 12 +12 +12 +12 = 48
असे सूत्र 26 डिसेंबर 2023 रोजी सुचवले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं. लोकसभेसाठी असलेले हे सूत्र आम्ही केवळ मविआ आणि इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही, तर मविआ अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाराचा फॉर्म्युला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही, तर जागा वाटपाबद्दल मविआमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे.
महाविकास आघाडीमधील पक्ष – शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागांवर लढवाव्यात ही वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमच्या प्रस्तावित फॉर्म्युलावर गांभीर्याने विचार करावा आणि प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र आमच्या 12 च्या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. मला मनापासून आशा आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिले जाईल”, असं प्रकाश आंबेडकर पत्रात म्हणाले.