प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या आजारी असल्यामुळे ते आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिले. त्यांची अनुपस्थिती राजकीयदृष्ट्या गाजत असून भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार अन्य कोणा नेत्यांकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे. परंतु भाजपच्या अनेक नेत्यांमध्येच याच मागणीवरुन राजकीय विसंगती निर्माण झाली आहे. Political discrepancy in the statements of BJP leaders regarding the post of Chief Minister
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा पदभार सोपवावा किंवा अगदी रश्मी ठाकरे यांच्याकडे पदभार सोपवून त्यांना मंत्री करावे, अशी सूचना केली, तर भाजपचे दुसरे आमदार प्रसाद लाड यांनी आदित्य ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्याची मागणी केली. त्यातही प्रसाद लाड हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे त्यांची अधिक पसंती अजित पवारांना होती.
परंतु चंद्रकांत दादा पाटील आणि प्रसाद लाड यांच्यापेक्षा वेगळे आणि विरोधी वक्तव्य भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवला तर ते चार दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र विकून मोकळे होतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
चंद्रकांत दादा पाटील, प्रसाद लाड आणि गोपीचंद पडळकर या तीनही भाजप नेत्यांच्या सूचनांमध्ये राजकीय विसंगती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यावर समन्वयाचा अभाव असल्याची टीका करणाऱ्या भाजप नेत्यांमध्येच नेमका राजकीय समन्वय आहे की नाही याचाच प्रश्न आता पडला आहे.