नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडचिरोलीतल्या आदिवासी मेळाव्यात एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पुढच्या निवडणुकीत लोकसभेत पाठविण्याचे आणि भाग्यश्री धर्मराव बाबा आत्राम यांना जिल्हापरिषदे पलिकडे जाऊन राज्याच्या राजकारणात संधी देण्याच्या दोन घोषणा शरद पवारांनी गडचिरोलीत जाऊन केल्या आहेत.Pawar’s gun is on BJP but always on Congress
विदर्भाच्या राजकारणासाठी या अत्यंत महत्त्वाच्या घोषणा आहेत. एकीकडे खंडणीखोर या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे न्यायालयीन लढाई लढत असताना विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नेमके कोणी करायचे?, असा प्रश्न पडला होता. तो कदाचित या निमित्ताने शरद पवारांनी सोडवला असल्याचे मानले जात आहे. परंतु, त्यापलिकडे जाऊन शरद पवार यांची राजकीय घोषणा नेमकी कशी आहे?, हे पाहिले पाहिजे.
धर्मराव बाबा आत्राम यांना लोकसभेत पाठविण्याची घोषणा शरद पवारांनी केली आहे. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट कोणत्या मतदारसंघातून देणार? कारण गडचिरोलीचे खासदार सध्या जरी भाजपचे अशोक नेते हे असले तरी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसचे नामदेवराव उसंडे हे 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुका लढले आहेत. मग काँग्रेस ही जागा स्वतःहून सोडून राष्ट्रवादीला देणार का??, की काँग्रेस आपला हक्क तिथे कायम ठेवत शरद पवार यांच्या राजकीय घोषणेला आव्हान देणार??, या प्रश्नाची चर्चा विदर्भातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शरद पवार हे नेहमी भाजपला जबरदस्त आव्हान देतात पण शक्तीक्षय मात्र काँग्रेसचा करतात, असा राजकीय अनुभव आहे. दिल्लीत त्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांना काँग्रेसमधून फोडून राष्ट्रवादीत प्रवेश दिला. ही घटना ताजी आहे.
पण जी लोकसभेची जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम यांची लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा करणे हे नेमके कसले राजकारण आहे?, हा प्रश्न पडतो आहे.
या संदर्भात 2019 च्या निवडणुकीतील नगर लोकसभा मतदारसंघाची आठवण होते ही राजकीय घटना फार जुनी झालेली नाही. त्यावेळी नगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जागा सोडावी म्हणजे काँग्रेसतर्फे सुजय विखे पाटील तिथून निवडणूक लढवू शकतात, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यावर शरद पवार यांनी लगेच कोणताही निर्णय दिला नाही. परंतु, राष्ट्रवादीतल्या विचार विनिमयानंतर पवारांनी नगरची जागा काँग्रेससाठी सोडणे शक्य नसल्याचा निर्णय दिला होता.
डॉ. सुजय विखे पाटील यांना ऐनवेळेला भाजप मध्ये जाऊन निवडणूक लढवून जिंकावे लागले. म्हणजे जी जागा सुजय विखे पाटील काँग्रेस मधून लढून जिंकू शकत होते, काँग्रेसला लोकसभेत आणखी एक जागा मिळू शकत होती, ती जागा सुजय विखे पाटील यांच्या रुपाने भाजपला मिळाली. कारण शरद पवारांनी काँग्रेसला नगरची जागा सोडली नाही.
अशा स्थितीत काँग्रेस 2019 चा अनुभव विसरून गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीसाठी सोडेल का? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर नगरला कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीत नगरला एक न्याय आणि गडचिरोलीला दुसरा न्याय!!, या शरद पवारांच्या राजकारणाला काँग्रेस अधिमान्यता देईल काय??, याविषयी देखील राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे. पवारांच्या विदर्भाच्या राजकीय दौऱ्याचे हे फलित आहे.
Pawar’s gun is on BJP but always on Congress
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी